श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार काही शेतकऱ्यांनी नुकताच उघडकीस आणला आहे.याबाबत आता कायदेशीर मार्गदर्शन घेऊन रितसर तक्रार केली जाणार असल्याचे समजते.दरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठीही कृषी सेवा केंद्र चालकाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. असेच प्रकार शेजारील तालुक्यांत देखील घडत आहेत.आता अशा सर्व संबंधित कृषी सेवा केंद्रांची गुण नियंत्रक पथकाडून तपासणी करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील काही सजग शेतकऱ्यांनी एका नामांकित कंपनीचे पोषक या पूर्व भागातील कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले.खरेदी केल्यानंतर त्यावरील कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न केला.परंतु खरेदी केलेले ते औषध एका मोठ्या कंपनीच्या नावाने बनावट पद्धतीने विकले जात असल्याने तो कोड स्कॅन झालाच नाही.त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा संशय बळावला. आपण खरेदी केलेले औषध बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी याबाबत कृषी विभागातिल काही निवृत्त अधिकारी व संघटना यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संबंधीत नामांकित कंपनीच्या नावाने ही औषधे बनावट पध्दतीने शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या या गंभीर प्रकाराची चौकशी होऊन सर्व संबंधित कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरगरीब शेतकऱ्यांकडून केली जात आहे.मुळातच शेती पिकांचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला असताना त्यात शेतकऱ्यांची अशी औषधांच्या बाबतीत फसवणूक केली जात असेल तर त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायलाच प्रवृत्त केले जात असल्यासारखा हा गंभीर प्रकार आहे.

श्रीरामपूरसह शेजारच्या तालुक्यात अशा प्रकारे शेतकऱ्यांना सर्रासपणे बनावट औषधे व कीटकनाशके यांची विक्री केली जात आहेत. याबाबतचे आपले कायदे कुचकामी ठरत असल्याने त्यातील पळवाटा शोधून काही कृषी केंद्र चालक अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना लुटन्याचे हे प्रकार करत आहेत.
-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना
2 thoughts on “श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार”
बातमी देताना हवेत बाण मारू नयेत . कोणता दुकानदार ? कोणत्या कंपनी ची बनावट औषधे विकतो ? कोणत्या शेतकऱ्याने प्रकरण उघडकीस आणलं? कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हा प्रकार चालू आहे ?पुढे काय कारवाई झाली? वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत वृत्तपत्राने किंवा बातमीदाराने दाखवावी. शेजारच्या तालुक्याचा उल्लेख करता, आपल्या शेजारी एकच तालुका आहे का? करा ना उल्लेख स्पष्टपणे ज्यांनी गुन्हे केले ते नाही घाबरत तुम्ही का घाबरता ?
तक्रार दाखल झाल्याशिवाय नाव घेता येत नाही बातमीत.. पत्रकारिता समजत नसेल तर तोंड खुपसू नये