श्रीरामपूर-
उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी नानासाहेब गलांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत योगिता गलांडे-मस्के यांनी सांगितले की, नानासाहेब गलांडे पाटील जमीन नोंद प्रकरणात अखेर सत्य उघड झाले असून ३०/१/२०२६ रोजी भूमीलेख उपसंचालक नाशिक यांनी अपीलवरील अंतिम निर्णयानंतर उंदीरगाव येथील गट क्रमांक ७९ संदर्भातील वादग्रस्त फेरफार कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरवत मूळ नोंदी कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जमीन नोंद
फसवणूक प्रकरणे रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही योगिता गलांडे मस्के यांनी म्हटले आहे.दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन घडामोडीही वेगाने पुढे सरकत असून फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या आरोपांप्रकरणी आरोपी क्रमांक १ प्रवीणकुमार उत्तमचंद छल्लानी व आरोपी क्रमांक २ राजेंद्रकुमार दुधेडिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६८, ४७१ सह ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मा. जितेंद्र डी. जाधव, न्यायाधीश प्रथम श्रेणी, कोर्ट क्रमांक १, श्रीरामपूर यांनी २५/२/२०२६ रोजी आदेश दिले आहेत. आरोपी क्रमांक ३ पंकज सुधाकर फेगडे, उप अधीक्षक, भूमिअभिलेख यांच्याविरुद्धची तक्रार फौजदारीप्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १९७ अंतर्गत मंजुरीच्या अभावामुळे नाकारण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस तपासही करण्यात आला असून, जबरदस्तीने नोंद लावून घेतल्याबाबत संबंधित अधिकाऱ्याने कबुली दिल्याची नोंद तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे खोटी नोंद व दबावातून करण्यात आलेल्या फेरफार प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून प्रशासन व न्यायव्यवस्थेच्या कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ह्या सर्व प्रकरणाचे कामकाज अॅड. बापूसाहेब इंगळे, अॅड. अरुण लबडे, अॅड. यशवंत उंडे यांनी बघितले.
