श्रीरामपूर-
समाजकंटक आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित वाटले पाहिजे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक असायलाच हवा असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे श्रीरामपूर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले गुन्हेगारीमुक्त शहर आणि शांतताप्रिय समाजासाठी पोलीस व जनता यांच्यातील ‘संवाद’ हाच सर्वात मोठा दुवा आहे.त्यामुळे हा संवाद कायम राखला जावा.यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप उपस्थित होते.दरम्यान शहरातील उपस्थित विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आपले विचार मांडले.अनेकांनी शहराची विस्कटत चाललेल्या घडीवर बोट ठेवत पोलीस प्रशासनाने कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी विनंती केली.
