श्रीरामपूर-
श्रीरामपूरच्या कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून नुकत्याच झालेल्या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करुन तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मुंबई गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन केली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर वेगळ्या वळणावर काही प्रवृत्ती नेऊ पाहत आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त होणे आवश्यक आहे. जाणीवपूर्वक काही समाजकंटक जातीय सलोखा बिघडावयाच्या हेतूने प्रयत्न करत आहे. हे सगळं तातडीने रोखणं गरजेचं असून पोलीस प्रशासनाला कठोर भूमिका घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश होणे गरजेचे असल्याचे आ. ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हा सगळा प्रकार वेळीच रोखला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल काहींचा उद्देश फक्त आणि फक्त जाती – जाती मध्ये धर्मा – धर्मा मध्ये द्वेष पसरवून अशांतता निर्माण करणे हाच आहे. मात्र श्रीरामपूरची जनता सुज्ञ आहे. आशा कुठल्याही प्रकाराला बळी पडणार नसल्याचे देखील आ.ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी म्हटले आहे.याबाबत आपण लवकर राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची देखील भेट घेणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे.
