श्रीरामपूर-
अशोक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.त्यात पुढे म्हटले की,अतिशय काटकसर व पारदर्शक व्यवहाराचा डांगोरा पिटणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाने नको ते उद्योग करून कारखाना आर्थिक अडचणीत आणला आहे. सुमारे साडेसहा लाख टन गाळप करणाऱ्या ‘अशोक’ ला २०२५-२६ च्या हंगामात केवळ तीन लाख नव्वद हजार टन गाळप करून हंगाम आटोपता घ्यावा लागला. सातत्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी मिळत असलेल्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अशोक कडे पाठ फिरवल्याने गाळप हंगाम अडचणीत येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानाना व्यवस्थापनाला सूचित केले होते. परंतु नेतृत्वाने सभासदांच्या मागणीकडे डोळेझाक केल्याने तसेच डिस्टिलरी व इथेनाॕल प्रकल्पांची क्षमता वाढ व इन्सनीरेशन बॉयलर या सारख्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रकल्पामुळे दरवर्षी कारखान्याला सुमारे ५० कोटी रुपये व्याजाचे भुर्दंड बसत आहे.ज्या कामगारांना कार्यकर्ता म्हणून कार्यक्षेत्राच्या चाळीस गावात मिरविले,आज त्याच कामगारांवर वेतन कपातीच्या निर्णयास सामोरे जाण्याची वेळ यावी या सारखे दुर्भाग्य नाही. अशोक कारखान्याच्या व्यवस्थापनापुळे कारखाना आर्थिक दिवाळखोरीत आला आहे.आज जे आर्थिक संकट उभे राहिले ते नको ते उद्योग आणि गैरव्यवहार यामुळे आहे,यात कामगारांचा काय दोष?असा सवाल करत कामगारांच्या पगार कपातीच्या निर्णयास सभासदांचा विरोध असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.अशोक कारखान्याचे बहुतांश कामगार हे सभासद किंवा सभासदांची मुले आहेत.त्यामुळे त्यांना कुणीही वेठबिगार समजू नये.कारखान्याच्या पैशातून शिक्षण संस्थांना आर्थिक रसद पुरवली जाते.कारखाना अडचणीत आहे तरी गाड्याघोड्या उडविल्या जातात,अशी वस्तुस्थिती असल्याने चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालकांनी कारखाना वाहने वापरु नयेत,भत्ते घेवू नये, गेस्ट हाऊस बंद करुन काटकसर करावी परंतु विनाकारण कामगारांवर अन्याय करु नये.वेतन कपातीचा निर्णय घेतल्यास व्यवस्थापनाला सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.
गेल्या ५-६ वर्षांतील गाळप हंगामामध्ये साधारण ३५-३७ लाख टन ऊसाचे गाळप होऊनही अशोक सहकारी कारखान्याचा संचित तोट्यात वाढ होऊन तोटा मागील अहवालानुसार साधारण ५० कोटी पर्यंत वाढलेला आहे.तो या वर्षीच्या अहवालात आणखी वाढण्याची शक्यता आहे.कामगारांचे गेला ८-९ महिन्यांपासून पगार नाहीत,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट थकलेले आहे या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकरी व सभासद तसेच आजी माजी कामगार व अशोक सहकारी साखर कारखान्यावर प्रेम करणार्या नागरीकांनी शहरातील विश्रामगृहावर २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली असून त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांनी केले आहे.
