श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव परिसरात काल दि.१९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस, जोरदार वादळी वारा आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू, मका आणि कांदा पिकांना बसला असून अनेक शेतांमधील पिके अक्षरशः आडवी झाली आहेत.
माळवाडगाव व आसपासच्या परिसरात दुपारच्या सुमारास हवामान अचानक बदलले. काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार मारा सुरू झाला. अवघ्या काही मिनिटांत शेतातील उभे पीक गारांनी झोडपून काढले. यामुळे आधीच काढणीच्या उंबरठ्यावर असलेले गहू, मका आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ पिकेच नाही तर शेतीसाठी बसविण्यात आलेल्या सोलर पंपांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोलर पॅनल फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी चिंतेत असून अनेकांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अवकाळी पावसाच्या या फटक्यामुळे माळवाडगाव परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
