श्रीरामपूर-
मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी शनिदेव गाव येथे सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहात लाखो भाविकांना उपदेश देताना केले.वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील शनिदेवगाव व सप्ताक्रोशीत सुरू असून रोज अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील भाविकांची अलोट गर्दी होत असून आज पाचव्या दिवशी सुमारे 5 ते 6 लाख भाविकांनी सप्ताहास हजेरी लावली.भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे

या गोष्टींनी आपली चित्ताची शुध्दी होत असते.आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.दिवसभरात लाखो भाविकांनी आमटी भाकरीचा महाप्रसाद घेतला याप्रसंगी विरोधी पक्षनेते आबांदास दानवे, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश पा बोरणारे, आमदार हेमत ओगले, माजी सभापती अविनाश पा गंलाडे, माजी सभापती संतोष पा जाधव, माजी सभापती बाबासाहेब पा जगताप, करण ससाणे सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगानंद महाराज, विकम महाराज, सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर मधुकर महाराज यांच्यासह लाखो भाविकाची उपस्थित होते

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट बेटाचा वारकरी भाविक भक्त हा शेतकरी कुटुंबातील किंवा शेतीशी निगडित असल्याने प्रत्येक वर्षी सप्ताहामध्ये कृषी प्रदर्शन भरवल्या जाते , आपली भारतीय संस्कृती ही ऋषी व कृषी असून शनिदेव गाव येथील१७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहात शेकडो एकर परिसरात भव्य असे कृषी प्रदर्शन आयोजित केल्या असून यामध्ये 300 च्या वर विविध कंपन्यांचे शेती अवजारे आधुनिक तंत्रज्ञान विविध मशनरी व कृषी निगडित तंत्रज्ञान पाहण्यास मिळते या प्रदर्शनामध्ये ही भव्य अशी गर्दी होताना दिसत आहे