श्रीरामपूर-नितीन शेळके
लोकसभा निवडणूकित आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग झाला.काही मूठभर लोकांनी राष्ट्रीय व अध्यात्मिक विचार संपवण्याचा विडाच उचलला होता. ही मंडळी संतांच्या विचारांनाही नष्ट करू पाहत होती. मात्र आमच्यासाठी संतशक्ती मैदानात उतरल्यामुळे आम्हाला
विजय मिळाला.सरकारे येतात व जातात खुर्ची आज आहे उद्या नसेल परंतु हा आपला देश व धर्म कायम राहिला पाहिजे,अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
श्री क्षेत्र देवगाव शनी (ता.वैजापूर) येथे १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यातील काल्याच्या किर्तनावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार रमेश बोरणारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खाताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, हे केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमण आहे.या विरोधात रामगिरी महाराजांनी चेतना जागवली. संत परंपरेच्या प्रेरणेतून समाजात नवा उमेदीचा स्फोट झाला. ही आध्यात्मिक शक्ती सुविचार देते, राष्ट्रभावना जागवते. आपल्याला असता जातीभेद विसरून एकसंघ व्हावे लागेल. देश, धर्म, आणि परंपरा टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. काही लोक समाजाला फोडण्याचे प्रयत्न करत आहेत. अशांना उत्तर देण्यासाठी संत विचारांची मशाल महत्वाची ठरेल.

मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी येतोच.हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता पुढच्या वर्षी सप्ताहात येताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी येतो आणि सोबत अजितदादांनाही घेऊन येतो, असे सूचक विधान केले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सप्ताहाची द्विशताब्दीकडे वाटचाल सुरू आहे. २००० साली लोणीचा सप्ताह स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला होता. तो सप्ताह जसा भव्य दिव्य झाला तसाच हा सप्ताह त्या पेक्षाही मोठा झाला. सनातन हिंदू धर्म परंपरा जोपासनेचे कार्य यातून सुरू आहे. ‘अवघा रंग एकचि झाला’ असा हा योग आहे. देवगाव शनी बंधाऱ्याची आमच्या भागातील शेतकऱ्यांची मागणी मान्य करा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आम्हाला सभा घ्यायची म्हटली की कित्येक अडचणी व कसरत करावी लागते. परंतु, इथे होणारी गर्दी ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. म्हणून मी तीन वर्षांपासून सतत आपल्या दर्शनासाठी येत आहे. जी कामे सांगितले ते सर्व करू. येथे विकास होणे गरजेचे आहे. हे आपल्या धर्माचे सरकार आहे. अयोध्यात राम मंदिर डौलात उभे केले.
स्वागत व प्रस्ताविक करताना आमदार रमेश बोरणारे म्हणाले, देवगाव शनी परिसरातील शेतकर्यांच्या वतीने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना विनंती करतो की, देवगाव शनी बंधारा घोषणेची प्रतीक्षा करतोय, तो मंजूर करावा. आभार दिनेश परदेशी यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच
ज्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना कधीच पश्चाताप होणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय दिला जाईल. हे सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिदेवगाव येथे केलं.
