श्रीरामपूर-
अशोक कारखाना ही एक तालुक्यातील अर्थकरणाची मोठी संस्था असून संस्थेचे कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम २०२५-२६ साठी उसाला ३५०० रु. प्रति टन दर द्यावा.तसेच मागील दोन हंगामाचे प्रतिटन ८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेतकरी संघटना, सभासद, कामगार व व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आली.निवेदनाची प्रत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचेसह अशोकचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांना देण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मागील दोन गाळप हंगामात इतर कारखान्यांसह गणेशच्या तुलनेत ८०० प्रति मे .टनाने दर कमी दिलेला आहे. वास्तविक आपणाकडून सातत्याने गणेश कारखान्याची बदनामी करून व सभासदांमध्ये भीती घालून ऊस उत्पादकांची गेल्या ३०-३५ वर्षापासून दिशाभूल केली गेली आहे. मागील दोनही गाळप हंगामामध्ये गणेश कारखान्याने ३००० प्रति टनानी ऊस उत्पादकांचे पैसे कुठल्याही वित्तीय संस्थेची अर्थात जिल्हा बँकेची सक्तीची कपात न करता दिले आहेत. सदर कारखान्याचा एकही संचालक जिल्हा बँकेच्या व्यवस्थापन समितीवर नसून आपण जिल्हा बँकेच्या संचालक मंडळपदी असूनही ऊस उत्पादकांची सक्तीने कपात केली आहे. आपण ऊस उत्पादकांच्या सक्तीने कपाती करून ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे.

आपण प्रत्त्येक सर्वसाधारण सभेत व प्रत्त्येक निवडणुकीत गणेश कारखाना सत्तांतरामुळे आजारी असल्याचे सातत्याने सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. वास्तविक गणेश कारखाना साखर निर्मिती करून मागील दोनही हंगामात ३००० रुपये प्रति टन दर देऊ शकतो. परंतु आपण सातत्याने गणेश पेक्षा ३०० रुपये साखर निर्मितीमध्ये कमी दिले. साहजिकच उपपदार्थ निर्मिती मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून किमान पाचशे रुपये प्रति टन गृहीत धरल्यास गणेश पेक्षा ८००/-रुपये प्रति टन जास्त देणे व्यवहार्य होते. परंतु आपणाकडून २७०० रुपये प्रति टन दर देऊन व जिल्हा बँकेची सक्तीची वसुली करून ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे.कारखाना कर्मचाऱ्यांचे ही पगार सात-सात महिने उशिराने होत आहे.या सर्व चुकीच्या बाबींमुळे ऊस उत्पादक सभासद व कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये अशोकच्या शेजारील राहुरी, गणेशसह वैजापूर तालुक्यातील पंचगंगा हा खाजगी नव्याने कारखाना सुरू होत आहे. पंचगंगा शुगर अशोकच्या कार्यक्षेत्रात ३०५० रुपये प्रति टनाने नोंदी घेत आहे.त्यामुळे सुरू होणाऱ्या हंगामासाठी ३५००/-रुपये प्रति टन दर बॉयलर पेटविण्यापूर्वी सर्वसाधारण सभेत घोषित करणे कारखान्याच्या हितरक्षणासाठी गरजेचे आहे.निवेदनाचा उद्देश कुठलीही राजकीय भूमिका नसून अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून ती वाचली पाहिजे हाच आहे,असे शेवटी म्हटले आहे.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक , डॉ. विकास नवले, सुजित बोडके, शिवाजी पटारे , संजय काळे, बबनराव उघडे, इंद्रभान चोरमळ, संदीप अभंग, भागचंद औताडे, कडू पवार, अकबर शेख आदिंसह ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
