श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडी मध्ये मिठाचा खडा पडला आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सर्वच्या सर्व जागी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
त्यामुळे श्रीरामपूरात काँग्रेस आणि उबाठा सेनेत ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार असल्याचे आज निश्चित झाले आहे.
काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून डावलले जात असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा निर्णय जाहीर केला.काँग्रेस आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि जिल्हाध्यक्ष सचिन कोते, तालुकाध्यक्ष लखन भगत, जेष्ठ नेते अशोक थोरे यांच्यात झालेल्या जागावाटपाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीतर स्वबळावर लढा’, असा आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिला होता.त्याप्रमाणे काँग्रेस आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली.शिवसेनेला जागा देताना काँग्रेसने कमी लेखल्याने शिवसेनेने आपला निर्णय जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तालुकाध्यक्ष लखन भगत म्हणाले की, पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासह १७ प्रभागांसाठी एकूण ३४ उमेदवारांचे पूर्ण पॅनल उभे केले जाणार आहे. दोन्ही मित्रपक्षांचे उमेदवार समोरासमोर निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने, याचा थेट परिणाम निवडणूकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. या ‘मैत्रीपूर्ण लढती’मुळे मतांचे विभाजन होणार आहे.दरम्यान ज्या महायुतीच्या फुटीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या ती महायुती आता एकसंघ दिसत असून उलटपक्षी सुरवातीला एकत्र दिसणाऱ्या महाविकास आघाडीतच फूट पडल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
