श्रीरामपूर-
चांगले लोक पक्ष संघटनेत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे अशी चांगली लोकं पक्षात आलिही पाहिजेत.ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना भाजप पक्षात चांगले भविष्य आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरामपूरात राजकीय भूकंप झाला तर आश्चर्य वाटायला नको, असे राजकीय भाकीत मा.खा.सुजय विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.भाजपमध्ये येणाऱ्या निवडणूक काळात होऊ घातलेल्या नवीन पक्षप्रवेशाविषयी विखे पाटील यांना छेडले असता त्यांनी रोखठोकपणे आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.शहराच्या मध्यभागी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवार, २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे मा.खा.डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासही प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कामही जलदगतीने पूर्ण होईल. स्मारकासाठी वनविभागाच्या जागेची अडचण दूर केली गेली आहे, तसा प्रस्ताव लवकरच नगरपरिषदेकडे पाठवला जाईल असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.त्यांनतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली.
महायुती संदर्भात बोलताना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची 90 टक्के महायुती करण्यासाठी समन्वय झालेला आहे.श्रीरामपूर तालुक्याबाबत बोलायचे झाल्यास महायुतीची चर्चा करण्यासंदर्भात नेमके बोलायचे तरी कोणाशी असा प्रश्न आम्हाला पडला आहे.शिवसेनेच्या शिंदे गटातील कोणत्या नेत्याशी बोलायचे तसेच काहीसे राष्ट्रवादीच्या बाबतही झालेले आहे.त्यामुळे आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनीच आपल्याला एक समन्वयक द्यावा, ज्याच्याशी आपण महायुतीसंदर्भात चर्चा करू शकू अशी मिश्किल टिपणीही त्यांनी यावेळी केली.
श्रीरामपूर तालुक्यातील वाढलेल्या गुन्हेगारीविषयी बोलताना ते म्हणाले शिर्डीप्रमाणेच श्रीरामपूरलाही महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स एमएसएमच्या माध्यमातून गुन्हेगारीला आटकाव केला जाईल.नगरपालिका व एम एसएफ यांच्यात त्याबाबत करार केला जाणार आहे. पुढील एक वर्षात शिर्डीप्रमाणे श्रीरामपूरही गुन्हेगारीमुक्त करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.आमदार हेमंत ओगले व आपल्यात विकासकामाच्या श्रेयवादावरून धुसफूस आहे का, यावर डॉ. विखे म्हणाले ओगले हे माझे जुने सहकारी आहेत.जे काम तुमचे आहे त्याचे श्रेय तुम्ही जरूर घ्या. मात्र जे काम महायुतीच्यावतीने केले जात आहे त्याचे श्रेय पालकमंत्र्यांचेच आहे.ते जे काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे शहरासह तालुक्यात त्यांचीच प्रतिमा खराब होणार आहे.पालकमंत्र्यांनी त्यांना चार कोटी रुपयांचा विकास कामांसाठी निधी देऊ केलेला आहे.
श्रीरामपूर शहराची पुढील पाच वर्षांचे विकासकामे नगरपरिषदेमार्फत केली जाणार आहेत. आगामी २५ वर्षे शहर उभे करण्याचा मानस आहे. अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन, उपनगर विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याला प्राधान्य देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
