श्रीरामपूर-नितीन शेळके
स्थानिक स्वराज्य संस्था आणि श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मा.खा.सुजय विखे पाटील यांनी नुकतीच श्रीरामपूर शहरात दिवसभर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यात आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच नगरसेवकपदांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.त्यानंतर पत्रकार परिषद घेवून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली आगामी निवडणूक काळातील भूमिका स्पष्ट केली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण 2 नोव्हेंबर रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगून त्यांनी इथून पुढच्या काळात श्रीरामपूर शहरासह तालुक्याच्या विकासाचा चेहरा हा विखे पाटील हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.स्व.जयंतराव ससाणे यांच्यानंतर श्रीरामपूरचा विकास करू शकेल असे खमके नेतृत्वच इथे तयार झाले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्रीरामपूरच्या विकासाची ती पोकळी आता आपण भरून काढणार असून येत्या वर्षभराच्या काळात श्रीरामपूर शहरात फोफावलेली गुन्हेगारीही मुळासकट साफ करू,असा शब्द त्यांनी यावेळी दिला. शिर्डीनंतर आता श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा नायनाट आपण करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.त्याचवेळी शहरासह तालुक्यातील मतदारांनी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करावे,असे आवाहनही त्यांनी केले.याबरोबरच ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना भाजप पक्षात चांगले भविष्य आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरामपूरात राजकीय भूकंप झाला तर आश्चर्य वाटायला नको,असे राजकीय भाकीत वर्तवून विखे पाटील यांनी मोठी खळबळ उडवून दिली.त्यांच्या या भाकितानंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या मनात चलबिचल निर्माण झाली.भाजपातील नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांना लागलीच या संभाव्य भूकंपाचे धक्के जाणवायला लागले.एकनिष्ठ विखे समर्थक कार्यकर्त्यांनाही याबाबत कुठलाच अंदाज दिसून येत नाही.काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपात घेऊन याअगोदरच विखे पाटील यांनी काँग्रेसला खिंडार पाडलेले असताना आता नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर आणखी कुणाला भाजपात प्रवेश देऊन ते राजकीय भूकंप घडवू पाहत आहेत,याविषयी त्यामुळेच उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान यावेळी सुजय विखे पाटील यांनी निवडणूका ह्या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असून विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते आता होणार नाही,हेही त्यांनी ठासून सांगितले.त्याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेमधील नेमक्या कोणत्या नेत्याबरोबर युतीची बोलणी करायची हे आपल्याला दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावे असा चिमटाही विखे पाटील यांनी त्या दोन्ही पक्षातील सध्याचे स्थानिक राजकिय संदर्भ देत काढला.श्रीरामपूर शहराची पुढील पाच वर्षांचे विकासकामे नगरपरिषदेमार्फत केली जाणार आहेत.आगामी २५ वर्षांचे शहर उभे करण्याचा मानस आहे.अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन, उपनगर विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याला प्राधान्य देणार असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक विखे पाटील यांच्या घरातील व्यक्ती लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर ‘विखे पाटील हेच श्रीरामपूरच्या विकासाचा चेहरा’ या मा.खा.सुजय विखे पाटील यांच्या वाक्यानेच आता त्या चर्चेचा समारोप होतो का,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
