श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने मला नाकारलं असलं तरी ज्या नुतन लोकप्रतिनिधीला इथल्या जनतेने निवडून दिले त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कुठलंच नवीन विकास काम मंजूर करून आणलेले नाही.माझ्या कार्यकाळात मी मंजूर करून आणलेल्या विकासकामांचीच उद्घाटने करण्याचाच धडाका त्यांनी सुरू ठेवला आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार लहू कानडे यांनी नाव न घेता विद्यमान आमदार हेमंत ओगले यांच्यावर केली.आपल्या यशोधन कार्यालयातील दिवाळी फराळ कार्यक्रमात कानडे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगततातून विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्याशी काँग्रेस पक्ष आणि इथल्या नेतेमंडळींनी कशा प्रकारे दगाफटका केला याचे विवेचन केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सचिन जगताप, अशोक कानडे,अंकुश कानडे, कैलास बोर्डे,राजेंद्र कोकणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मा.आ. कानडे पुढे म्हणाले की,गेल्या वर्षभरात निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय काम करतात याकडे मी बारीक लक्ष ठेवून होतो.मी बोलायचंच नाही असे ठरवले होते परंतु आता तालुक्यातील जनतेसाठी मला आजपासून पुन्हा बोलावंच लागणार आहे.श्रीरामपूरच्या विकासात अडथळा आणण्याचे प्रकार जनतेला दिसत आहेत.२०१९ ते २०२४ या कालावधीत आम्ही १३oo कोटी रुपयांचा विक्रमी निधी आपण मतदारसंघात आणला.आणलेला निधी त्याच कामासाठी वापरला गेला. २२o केव्हीए सबस्टेशन, बसस्थानक सुशोभीकरण व रस्त्यांची कामे आपणच मंजूर करून आणली होती. आज त्याच कामांची उद्घाटने नव्या लोकप्रतिनिधीकडून केली जात आहेत.नव्याने कुठलेच काम मंजूर करण्यात आलेले नाही.श्रीरामपूरातील अनेक शासकीय कार्यालयांत आता ‘गमती जमती’ सुरू झाल्या आहेत.त्या मी पाहतोय योग्य वेळ आल्यावर त्यावर बोलणार आहे.
मी निवडून आल्यानंतर माझ एक छोटासा हट्ट होता की मी या तालुक्यातील जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोय मला नेता नाही व्हायचं परंतु किमान आमदार म्हणून तरी मला माझ्या पध्दतीने काम करू द्या.परंतु त्याला प्रस्थापित नेतेमंडळींनी विरोध केला,अशी
टिकाही कानडे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या करण ससाणे गटावर केली.आपलं नेतृत्व रुजू द्यायचेच नाही हा अनेकांचा हेतू होता.मी ठरवलं असत तर भाजप किंवा शिवसेना अशा कुठल्याही पक्षात जाऊन त्यांचे तिकीट मिळवू शकलो असतो,परंतु आपण तसे केले नाही.अखेरीस काँग्रेस पक्षाने ज्या पाच विद्यमान आमदारांची तिकिटे कापली त्यात आपलाही समावेश झाला.तरीही येणाऱ्या काळात मी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत इथल्या जनतेची सेवा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य सन्मान राखला गेला नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नगरपालिका,जि. प.व पंचायत समितीच्या निवडणूका स्वबळावर लढवल्या जातील,असेही कानडे शेवटी म्हणाले.
