श्रीरामपूर-
ऊस उत्पादकांचे मागच्या हंगामांचे राहिलेले प्रति टन 800 रुपये देऊन येणाऱ्या गळीत हंगामाचा भाव शेजारच्या कारखान्यांप्रमाणे 3 हजार रुपये द्या.शेतकरी नक्कीच अशोकला ऊस देतील,असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे यांनी केले.
कमलपूर येथील शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन ऍड अजित काळे यांच्या हस्ते सम्पन्न झाले.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप,संतोष पटारे, शिवाजी पटारे, सुजित बोडखे, मेजर गव्हाणे, डॉ. विकास नवले ,साहेबराव चोरमल, कडूभाऊ पवार ,शरद आसणे , सुनील आसने,अकबरभाई शेख ,गोरख पवार ,संदीप उघडे , अँड.प्रशांत कापसे, अँड.सर्जेराव घोडे, सचिन वेताळ, सुनील असणे, बाबासाहेब असणे ,बाळू असणे चक्रनारायणआदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
ऍड.अजित काळे पुढे म्हणाले की,कमलपूर मला नवीन नाही.इथे शाखा उघडली जातेय याचा आनंदच आहे.संघटनेच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुमचा हिशोब नक्की करू,असा इशाराही त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले जिल्ह्यात शेजारचे कारखाने उसाला 3000 भाव देतात तुम्ही तो का देत नाही?अशोक कारखाना तितका भाव का देऊ शकत नाही हे तुम्ही एकदा समोर येऊन स्पस्टपणे समजून सांगितले पाहिजे.इतकी वर्षे एकहाती सत्ता तुमच्या ताब्यात दिली.आज 450 कोटींचे कर्ज कारखान्यावर झालेले आहे.आम्ही कधी राजकारणात यायचे ठरवले नव्हते परंतु तुम्ही ती भूमिका संघटनेला घ्यायला लावली.येणाऱ्या अशोक कारखाना निवडणूकीच्या माध्यमातून शेतकरी संघटना आणखी ताकदीने पुढे येणार आहे.40-40 वर्ष आम्ही ऊस अशोकला दिला आता तुम्ही म्हणता बाहेर ऊस देऊ नका नाहीतर आपला कारखाना बंद पडेल.तुम्ही किमान उच्चंकी भाव देणाऱ्यांच्या बरोबरीने भाव जाहीर करा शेतकरी नक्की अशोकलाच ऊस देतील.तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही रात्रीतून आपले विचार बदलता आणी राजकिय सेटलमेंट करता.परंतू संघटनेची वैचारिक भूमिका ठाम आहे.शेतकऱ्यांना कोणाच्याही गुलामगिरीतुन बाहेर काढायची ताकद फक्त शेतकरी संघटनेत आहे.येणाऱ्या काळात अशोक कारखाना शेतकरी संघटना 100 टक्के ताब्यात घेवून शेतकऱ्यांना चांगला भाव देईल.शाखेच्या उद्घाटनामुळे आता कमलपूरकरांची जबाबदारी आहे की अशोकच्या निवडणूकित जास्तीत जास्त मतदान जास्त संघटनेच्या उमेदवाराला झाले पाहिजे,असेही ते शेवटी म्हणाले.जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, आमचा लढा हा कोणत्याही नेत्याच्या विरोधात नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका संघटनेची आहे.ऊस दराच्या प्रश्नावर आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.काळे कारखान्याने 3100 भाव दिला.गणेश विनाकपात 3000 भाव देतो.अशोक मात्र 2700 भाव देतो.मागच्या दोन हंगामाच्या राहिलेले 800 रुपये द्या ते जमत नसेल तर सत्ता सोडून खुर्च्या खाली करा,असे आव्हान औताडे यांनी केले.प्रास्तविक पत्रकार नितीन शेळके यांनी केले.तर आभार बाळासाहेब मुरकुटे यांनी मानले.याप्रसंगी कमलपूरचे शाखाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,गणेश मुरकुटे,अशोक गोरे, रावसाहेब मुरकुटे,दिगंबर गोरे,भाऊसाहेब गोर्डे,सुभाष तांदळे, रवी मुरकुटे,हरिभाऊ दवंगे,शिवाजी गोरे आदींसह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
