श्रीरामपूर-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने गहु, कांदा, मका, द्राक्ष टरबुज यांसारख्या या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्या असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, राधाकिसन बोरकर, अनिल ढोकचवळे, विजय ढोकचवळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.गारपीट व अवकाळी मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता तोंडाशी आलेल्या पिकांना अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करा असे आदेश आमदार ओगले यांनी प्रशासनाला दिले आहे.एकीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, खतांचे वाढलेले दर, फसवी कर्जफामी यासारख्या अनेक संकटांना शेतकरी सामोरे जात असताना त्यातच अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये देखील अवकाळी मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी करणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले आहे.
