श्रीरामपूर-
अहील्यानगर जिल्ह्यामध्ये १५ व १६ सप्टेंबर रोजी २४ तासाच्या आत सरासरी१०० ते १५० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील सोयाबीन, भुईमूग, मूग, कपाशी, ऊस पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान झाले.राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती निवारण कायदा २०१५ अन्वये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३८००० रुपये मदत कुठलेही पंचनामे न करता व निकष न लावता तात्काळ करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात औताडे यांनी म्हटले की, राज्य शासनाने मागील दोन वर्ष नैसर्गिक आपत्ती निवारण कायदा अंतर्गत केली जाणारी मदत बंद करून एक रुपयात पिक विमा योजना आणली होती.सदर पिक विमा योजना राज्य सरकारने बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः विमा हप्ता भरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविन्याकडे पाठ फिरविली आहे. अहिल्यानगर जिल्ह्या हा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने जून – जुलै ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत सरासरीपेक्षा 50 टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने ऊस पिकांसह खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सलग दोन दिवस २४ तासाच्या आत मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेने पिकांची काढणी करणे जिकरीचे झाले आहे. अजूनही परतीचा मान्सून सुरूच आहे.१० ते १५ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. मागील गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही दर मिळालेला नाही. राज्यातील शेतकरी हा आज रोजी ८० टक्के सेवा सोसायटी व राष्ट्रीयकृत बँक स्तरावर थकबाकीत आहे. येणाऱ्या उत्पादनातून त्याला त्याचा चरितार्थ चालवायचा होता परंतु सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये राज्य सरकारने कुठलेही पंचनामे न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे.
