श्रीरामपूर-
गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काल दि.15 रोजी सायंकाळ नंतर जोरदार पाऊस सुरु झाला.तो रात्री साडेनऊपर्यंत चांगलाच बरसला.त्यांनंतर रात्रभर पावसाची संततधार सुरू होती.आज दि.16 रोजीही दुपारनंतर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये दोन-अडीच तास कोसळलेल्या पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी झाले. श्रीरामपूर शहरातही अनेक सखल पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सखल भागात पाणी साचले होते. शहरातील गटारे तुडुंब भरून वाहू लागली.अनेक भागात नागरिकांची मोठी तारांबळ झाली.नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मध्यरात्रीपर्यंत पथके तयार करून जमा झालेले पाणी वाहते राहील यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.दरम्यान कालच्या ग्रामीण भागात सोंगणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच अनेक भागात लवकर लागवड झालेल्या कापसाची वेचणी सुरू झाली होती. तो कापूसही या पावसाने भिजला असुन वाढलेल्या ऊस पिकाचे देखील पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे. त्याला पाऊस उघडल्यावर उंदरे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सोयाबीन पिकांवर पाणी साचल्याने कुज येण्याची भीती आहे. कापसाला डाग पडले असून, अनेक ठिकाणी उभा ऊस भुईसपाट झाला आहे.जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सरसकट पीकविमा मिळावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
