श्रीरामपूर-
कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी चॅप्टर केसेस प्रकरणी सुनावणी घेवुन रेकॉर्डवरील १६ गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी गुन्हेगारांविरुद्ध अतिशय प्रभावीपणे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपल्या अधिकारांचा प्रभावीपणे वापर करत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच इतकी मोठी कारवाई आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
अपर पोलीस अधीक्षक यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२६,१२७,१२८,१२९ खालील चॅप्टर केसेसचे कामकाज त्यांच्यासमक्ष चालते. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १६३ खालील प्रवेशबंदी प्रस्तावांवर देखील कार्यकारी दंडाधिकारी यांचेपुढे कामकाज होते.आपल्या हद्दीतील विविध पोलीस स्टेशनकडुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या चॅप्टर केसेस अपर पोलीस अधीक्षक यांचेपुढे पाठविण्यात आल्या होत्या. त्यात सुनावणी अंती १६ रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यापैकी काही जणांनी बंधपत्र करुन देण्यासाठी जामीनदार हजर केले नाहीत तर काहींनी बंधपत्र केल्यानंतर पुन्हा बंधपत्राचे उल्लंघन करुन नव्याने गुन्हे केले आहेत.त्याअनुषंगाने या १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.
आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर चॅप्टर केसेसखाली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२९ अन्वये कारवाई करून अहवाल सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश दिलेले होते.
त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी
जयदत्त भवर, कुणाल सोनवणे,अमोल भारती यांनी आपआपल्या विभागातील पोलीस स्टेशनला ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे श्रीरामपुर शहर, संगमनेर शहर, राहुरी, कोपरगाव शहर, लोणी पोलीस स्टेशन यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केले होते
