श्रीरामपूर-
कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितली.जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते.अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले.याचा आनंद मंत्री विखे पाटील यांनी जलपूजन करून व्यक्त केला.धरणावर येवून त्यांनी नाथसागराची खणानारळाने ओटी भरून गोदामातेची आरती केली. यावेळी सायरन वाजवून पाणी सोडण्याची औपचारिक प्रक्रीयाही त्यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आली.अनेक वर्षानंतर जुलै महीन्यातच नाथसागर भरण्याचा हा क्षण लाभक्षेत्राला यंदा अनुभवता आला याचे समाधान असल्याचे उद्गार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी काढले.याप्रसंगी आ.हिकमत उढाण,आ.विजयसिंह पंडीत, आ.रमेश बोरनारे, आ.विलास बापू भुमरे,आ.विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य अभियंता अरूण नाईक, सुनंदा जगताप, मुख्य अभियंता राजीव मुंदडा,सभापती राजू भुमरे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादापाटील बार्हे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,या धरणामध्ये माझ्या बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्यानंतर खिर्डी गावाला भेट देण्याचा योग आला. धुळे येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होतो तेव्हा सायकलवर नाथसागर पाहायला कसे आलो आणि जाताना बसवर सायकली टाकून कशा नेल्या हेही त्यांनी यावेळी सांगितले.पंतप्रधान इंदिरा गांधी याठिकाणी आल्या तेव्हा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचा अमृतमहोत्सवी सत्कार येथे झाला.मुख्यमंत्री असलेले स्व.शंकरराव चव्हाण आणि तेव्हाचे पाटबंधारे मंत्री बी.जे.खताळ यांच्यासह अनेकांच्या असलेल्या उपस्थीतीलाही त्यांनी उजाळा दिला.भविष्यात पाण्याचे संघर्ष आपल्याला संपवायाचे आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारने केला आहे.आता उल्हास खोऱ्यातील पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी महायुती सरकारने आरखडा तयार केला असून त्यावर काम सुरू झाले.केवळ सर्व्हेक्षणासाठी ६० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरदूत केली असून नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय नासिक येथे सुरू होत असल्याची माहीतीही त्यांनी दिली.डाॅ.बाळासाहेब विखे पाटील आणि डॉ.गणपतराव देशमुख या दोघांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व आपल्यावर सोपविले गेले असल्याने ते पूर्ण करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री म्हणून घेतली असल्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.या परीसारातील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास जलसंपदा विभागाच्या माध्यामातून करण्यात येणार असून अन्य काही प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करणार आहे.आ.विलास बापू भुमरे म्हणाले की नाथसागराचे जलपूजन करणारे पहीले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे ठरले आहेत.या भागातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला ३०२ कोटी रूपये मंजूर केल्याबद्दलही त्यांनी आभार मानले.

कार्यक्रम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या घोषणाबाजीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या प्रतिनिधींनीना बोलावून घेत सभेच्या ठिकाणीच प्रश्नाबबात चर्चा केली आणि जिल्हाधिकरी स्वामी यांना त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.