श्रीरामपूर –
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या भंडारदरा व निळवंडे धरण परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून त्या जागा विकसित करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी आ. डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे,नाशिकचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, निळवंडे प्रकल्प अभियंता प्रदीप हापसे, गणेश हारदे आदी उपस्थित होते.भंडारदरा धरणाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त जलसंपदा विभागामार्फत पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विभागाच्या ताब्यातील विविध जागांची त्यांनी पाहणी करून विकासाच्या दृष्टीने सूचना केल्या.गेल्या काही वर्षांत अतिक्रमण झाल्यामुळे विभागाच्या जागांचा उपयोग होऊ शकला नव्हता. सध्या मराठवाडा व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील धरण परिसरातील जागा पर्यटनासाठी विकसित करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने स्वीकारले आहे. रंधाफॉल परिसरातही अशाच प्रकारे पर्यटनविकासाचे नियोजन करण्यात आले आहे,असेही ना. विखे पाटील म्हणाले.
