श्रीरामपूर-
निळवंडे धरणासंदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देण्याची काहीच आवश्यकता नाही.जनतेनेच त्यांना विधानसभेला त्याबाबतचे उत्तर दिले आहे.खर तर त्यांनीच आता आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.लोणी येथे माध्यमांशी संवाद साधताना ना. विखे पाटील पुढे म्हणाले की,बोगस आणि खोटे मतदार संबोधून त्यांच्याच तालुक्यातील मतदारांचा अपमान ते करीत आहेत.पराभव झाल्यामुळे आता चाळीस वर्षानंतर तुम्हाला मतदार बोगस वाटायला लागले का? आयोगाकडून मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी मुदत दिली जाते. मात्र आज आयोगावर आरोप करणारे तेव्हा झोपले होते का? कोणत्याही निवडणुकीचा निकाल खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे.’जाणता राजा’ यांना जाणीव करून देण्यासाठी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. कारण ते एकीकडे सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालात केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्याचे मोठे मनही दाखवत नाहीत. याबाबतची वस्तूस्थिती मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने व्हीएसआयच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितली होती. तोच संदर्भ माझ्या भाषणात होता.राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून झाले आहे.
अजितदादांबद्दल अवमानकारक बोलण्याचा प्रश्नच नाही
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास केला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल माझे वक्तव्य नव्हते. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा प्रश्नच नाही. तसे माझ्याकडून कधीही झालेले नाही.अनेक वर्ष देशात कृषीमंत्री पदावर राहूनही ज्यांना सहकारी कारखानदारी बाबत कोणतेही निर्णय करता आले नाहीत, अशा जाणत्या राजांना जाणीव करून देण्यासाठी मी बोललो.
