श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील एका विहरीत पाच जणांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वादातून बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.पती पत्नीत सुरू असलेल्या वादात चिमुकल्यांचा बळी जाऊन सम्पूर्ण कुटुंबच संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका विहिरीत पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत स्वतः ही जीवन संपवलं.अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात निघून गेली होती. तो तिला परत बोलावण्यासाठी सारखे फोन करत होता परंतु ती प्रतिसाद देत नसल्याने अरुणने आपल्या चिमुकल्यांसह आपली जीवनयात्रा संपवली.अरुण काळे याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. शिवानी अरुण काळे (वय ८), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ५) अशी मृत मुलांची नावे आहेत. अरुणने या चौघांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःचे हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. त्यानंतर विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशन येथे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
