श्रीरामपूर-
२५–२५ वर्षे राज्यात मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही.आजही संगमनेर मतदारसंघात २०० पाण्याचे टँकर धावतात.अखेर संगमनेर मतदारसंघातील लोकांनीच मनावर घेतले आणि बदल घडवला.सर्वसामान्य घरातील आमदार अमोल खताळ यांना जनतेने निवडून दिले,अशी जहरी टीका माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता मा.खा.डॉ.सुजय विखे यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत ते म्हणाले की, पन्नास वर्ष सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना सुध्दा तुम्हाला जे करता आल नाही, ते पोरा बाळांनीच करून दाखवत पाणी आणले.डॉ. विखे पाटील म्हणाले,“निळवंडे डावा कालवा योजना ३०–४० वर्षांपासून फक्त कागदावर होती. या दरम्यान अनेकदा बैठका झाल्या, आश्वासने दिली गेली, पण गोरक्षवाडी, संगमनेर आणि आसपासच्या गावांपर्यंत पाण्याचा थेंब पोहोचत नव्हता. जनतेच्या अपेक्षा वारंवार वाढवल्या, पण त्यांची पूर्तता झाली नाही. आज या प्रकल्पामुळे केवळ शेतीसाठीच नाही, तर पिण्यासाठीही भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे. हा टप्पा शेतकऱ्यांच्या जीवनमानात क्रांती घडविणारा असल्याचे डॉ विखे म्हणाले.घोषणांनी पोट भरत नाही, प्रत्यक्ष काम केल्याशिवाय जनता खुश होत नाही.प्रत्यक्ष कामाला तालुक्यात सुरूवात झाली आहे.भोजापुरचं पाणी नानज दुमाला, तीगाव, सोनोशी पर्यंत पाणी पोहोचवलं. गेली ३० वर्षे हा चमत्कार कुणीच घडवू शकला नव्हता. पण शिस्त, नियोजन आणि कटाक्ष ठेवल्यास अशा योजना पूर्णत्वाला जाऊ शकतात. पाणी आणणं हे केवळ राजकारण नसून जनतेच्या जगण्याशी संबंधित कामाची आणि कर्तव्याची जबाबदारी असल्याचे डॉ विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.या प्रकल्पामागे केंद्र सरकारचा मोठा वाटा असल्याचे सांगून पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र सरकारच्या निधीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालं. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला.पुढील दोन वर्षांत निमगावजाळीचा प्रत्येक कानाकोपरा पाण्याखाली आणू,” असा जनतेसमोर शब्द दिला.जलपूजनानंतर गोरक्षवाडीत जलयात्रा काढण्यात आली. डोल-ताशांच्या गजरात शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी विखे पाटील यांचा सत्कार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
