श्रीरामपूर-
ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून महिलेला तिच्या नणंद व सासूने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे.तसेच या महिलेला हिंदू धर्माची पूजा करण्यासही मज्जाव करण्यात आल्याने सदर महिलेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले की, वैशाली मंगेश साळवे, वय ३७,रा.गोंधवणी, वॉर्ड नं. १,श्रीरामपूर माझे २००९ मध्ये मंगेश साळवे याच्यासोबत आपले ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले. लग्नाच्यावेळी पती व सासरकडील लोकांनी आपल्याला हिंदू पद्धतीने पुजाअर्चा करण्याची व हिंदू धर्मानुसार राहण्याची परवानगी दिल्याने आपण लग्न केले होते.त्यानंतर पतीही हिंदू धर्म पद्धतीने पुजाअर्चा करायचा. परंतु याचा राग आपल्या मोठ्या नणंद, लहान नणंद, त्यांचा मुलगा, सासू यांना येवून त्यांनी आमच्या घरात हिंदू धर्माची पुजा करायची नाही, देवाची मूर्ती घरात ठेवायची नाही असे बोलून भांडण केले.दोन दिवसांपूर्वी आपण नगरला भरोसा सेल येथे गेलेलो असताना आपल्या नणंद, सासू यांनी आपल्या गोंधवणी येथील घरी जाऊन घरात जबरदस्तीने घुसून घरातील संसारोपयोगी साहित्य एका टेम्पोत भरले.तसेच घरातील देवी-देवतांचे फोटो एका बॅगमध्ये भरून कोठेतरी नेल्याचे आपल्याला फोनवरून मुलाने सांगितले. वैशाली साळवे हिच्या फिर्यादीवरून संध्या सुशील गायकवाड, संगिता आनंद मोरे, शारदा साहेबराव साळवे, ऋषिकेश मोरे यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ हे करीत आहेत.
