श्रीरामपूर-
हिंदुत्वाच्या नावाखाली ज्यांनी श्रीरामपुरात आयुष्यभर दलाल्या केल्या त्यांच्यामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी हा पराभव तांत्रिक असून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत जे श्रीरामपूरच्या विकासाचे आश्वासनं दिले ते पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू,असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे मार्गदर्शन करताना बोलत होते.येथील उत्सव मंगल कार्यालयात नगरपालिकेत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांचा सत्कार समारंभ विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की,एका देशद्रोही माणसाच्या अंत्यविधीला श्रीरामपुरात एवढे लोक येतात आणि असे सांगितले जाते की तो या बॉम्बस्फोटात नव्हता, तो त्या बॉम्ब स्फोटात होता.बॉम्बस्फोटातील आरोपीचे समर्थन करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली दलाली करणारेही या विषयावर शब्दभर बोलायला तयार नाही. त्यांची अजून साधी प्रतिक्रिया देखील यावर नाही. या महाराजांचं नाव घ्यायचं,त्या महाराजांचं नाव घ्यायचं.महाराज लोकांना खोटेनाटे सांगून या दलालांनी आजवर दलाल्या केल्या.त्यांची वस्तुस्थिती त्या महाराजांपुढे मांडून तुम्हाला यांनी कसे फसवले हे सांगण्याची गरज आहे.आपल्यामध्ये काहींनी वर्षानुवर्षे मांडवलीचा धंदा स्विकारलेला आहे आणि या मांडवलीच्या या धंद्यामुळे हा पराभव स्विकारवा लागला आहे. अनेक ठिकाणी १०-१०, २०-२० मतांनी उमेदवार पराभूत झाले त्या ठिकाणी या दलाली करणाऱ्या लोकांना ४००-५०० मतं पडली,त्यामुळे हा पराभव झाला. हा तांत्रिक पराभव आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला १८ हजार मतं पडली, काही वॉर्डामध्ये आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला जादा मतदान आहे तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी कमी मतं आहे. क्रॉस व्होटींगचाही फटका पक्षाला बसला आहे. ते का झालं? याची कारणमिमांसा करत बसण्यापेक्षा पराभव झाला, तो सोडून देत पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागणे गरजेचे आहे.देशात, राज्यात भाजपाचं खंबीर नेतृत्व असल्याने येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाला निवडून आणायचे आहे,असे ना. विखे पा.यांनी स्पष्ट केले.शहरातील वॉर्ड नं.२ मध्ये जावून एका विशिष्ट भागात विरोधकांना १५ जागा मिळतात. भाजप सरकारच्या योजना तुम्हाला चालतात मात्र मतदानावेळी या पक्षाचे तुम्हाला एवढे वावडे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आपल्या नगरसेवकांचा यंत्रणेवर दबावर राहीला पाहीजे. समोरचे लोक जे निवडून आले ते एका विशिष्ट भागातूनच निवडून आले. मी कर्मवीर चौकात एकाच पोस्टर पाहीलं, मी मुख्याधिकाऱ्यांना आणि पोलिसांना विचारणार आहे की हे देशभक्ताचं पोस्टर आहे की कोणाचं आहे? एक देशद्रोही माणूस आहे, त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहे. केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम जामीनावर तो सुटलेला होता. तो बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. अशा माणसाचे पोस्टर लागतात यापेक्षा आणखी काय दुर्दैव पाहीजे. तुम्ही नागरीकांनी स्वतःहुन ते काढून टाकायला पाहीजे होते. पण आपल्यामध्ये धमक कुठे राहीली? हा याला घाबरतो, तो त्याला घाबरतो असत असंच आपण बोटचेपेपणाचं धोरण स्विकारलं तर आपल्याला लोकं रस्त्यावर फिरून देणार नाही,असेही पालकमंत्री विखे पाटील शेवटी म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा.सभापती दिपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय गांगड, संजय छल्लारे, आशिष धनवटे, सौ. वैशाली चव्हाण, दिपक चव्हाण, सौ. स्नेहल खोरे,भाऊसाहेब बांदरे,शंकर मुठे,आशाताई रासकर यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
