श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच शहरातील अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून येत्या आठ दिवस दिवसांत विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकालीकाढू असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत येथे शासकीय आढावा बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,श्रीरामपूर शहरात एसटी महामंडळाची फार मोठी जागा उपलब्ध आहे. त्या जागेमध्ये गाळे बांधून विस्थापित व्यापाऱ्यांना ते गाळे देण्याचा आपला विचार आहे.
याप्रसंगी सुभाष त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड, नेहरू मार्केट समोरील विविध व्यवसाय करून आपली उपजीविका भागवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर श्रीरामपूर नगरपरिषदेने बुलडोझर फिरवून त्यांना बेरोजगार केले.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. एसटी महामंडळाच्या जागेत गाळे बांधून पुनर्वसन करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.तोपर्यंत विस्थापित व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे त्या जागेवर पाच फुटांची जागा देऊन त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे. विस्थापित व्यापारी त्यासाठी नगरपरिषदेबरोबर एखादा करारनामाही करून देण्यास तयार आहेत. त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यास सहमती दर्शवली असल्याचेही त्रिभुवन यांनी सांगितले.
