श्रीरामपूर-
भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू पाटबंधारे विभागाने ते न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे टांगले आहेत. या पाटचाऱ्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी पाटबंधारे कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.
याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावर्षी अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी शेतातील गाळ,माती, दगडधोंडे पाण्यातून वाहत येऊन चारीमध्ये छोटेमोठे भराव तयार झाले आहेत. तसेच अतिपावसाने चारीत गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पाटचारीकडे पाटपाणी व्यतिरिक्त इतरवेळी संबंधित विभागाचे लक्ष राहत नाही.पाटात पाणी दिसले की मग जेसीबीचा शोध घेऊन कुठेतरी चारी दुरूस्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला जातो.त्यातून प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचत नाही. अशीच परिस्थिती सध्या चालू रब्बी हंगामात पहावयास मिळत आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी सुटलेले आवर्तन बेलपिंपळगाव, कारेगाव, वडाळा या विभागात पोहचले. परंतू त्या ठिकाणी चाऱ्या नादुरूस्त असल्याने अनेक लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी गेले नाही.शेतकरी सिंचन शाखेमध्ये चकरा मारतात. ७ नं. अर्ज भरण्यासाठी जातात. तेव्हा त्या सिंचन शाखेमध्ये कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतो. तसेच पाणी अवर्तन चालू असताना देखील उपअभियंता, पाटकरी कर्मचारी असे कोणीही अधिकारी सिंचन शाखेत भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात. शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जाची पोहोच दिली जात नाही.त्याचप्रमाणे पाणीपट्टी भरल्यानंतर पोहोच पावती देण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यासह इतर अनेक प्रश्नांसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपण कारवाई करून चालू रब्बी आवर्तनामध्ये पाणी मागणी अर्ज दिलेल्या शेतकऱ्यांचे भरणे राहिल्यास त्यांना नुकसान भरपाई देणार आहात का? याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसे ना झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी कार्यालयासामोर अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
