श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरासाठी तयार होणाऱ्या नवीन साठवण तलावाचे काम चालू असल्याने व पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या तलावातील साठवलेले पाणी पाटबंधारे खात्याचे रोटेशन येईपर्यंत पुरविणे गरजेचे असल्याने पंधरा दिवसापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.सात तारखेला भंडारदर्यातून पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. सदरचे पाणी नऊ तारखेपर्यंत श्रीरामपुरात येईल.त्यामुळे दहा तारखेपासून शहरवासीयांचा दररोजचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन सात तारखेला पिण्याचे पाण्याचे रोटेशन सोडण्याचे आदेश केले.सदरचे रोटेशन महिनाभर चालणार असल्याने तोपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल.त्यानंतर पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.
नगरपालिका प्रशासनाने कॅनलचे लांबलेले रोटेशन पाहता आहे ते पाणी महिनाभर शहरवासीयांना पुरावे यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर नगराध्यक्ष करण ससाणे व आमदार हेमंत ओगले यांनी तातडीने तलावाची पाहणी करून पाटबंधारे खात्याशी संपर्क केला व पाणी रोटेशन लवकर सोडण्याबाबत विनंती केली.शहरात अनेकांना अभूतपूर्व अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही पाणीटंचाई पाहून नागरिकांना ४० वर्षांपूर्वीचे दिवस आठवत आहेत.
साठवण तलावाचे बांधकाम सुरू असताना पालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई भासू नये म्हणून साठवण तलावाच्या मध्ये भिंत घालून तलावाचे दोन भाग करून एका भागात पाणी साठवले होते.परंतु अचानकपणे हा भराव वाहून गेल्याने तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले त्यानंतर तो भरावच काढून टाकला. त्यामुळे पाणीसाठा करणे शक्य झालेले नाही.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन देखील जुन्या झाल्या आहेत. त्या वारंवार लिकेज होतात तसेच वीज टंचाईमुळे शहरातील अनेक भागातील लोक त्रस्त असून त्यामुळे देखील पाणीटंचाई निर्माण होते.कारण ज्यावेळी पाणी सुटते त्याचवेळी लाईट गेलेली असते तर काही वेळा लाईट असते मात्र पुरेसे होल्टेज नसल्याने पाणी वर टाकीमध्ये जातच नाही अशा अनेक समस्या सध्या आहेत.नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन श्रीरामपूरची पाणीपुरवठा स्थिती समजून घेतली आहे. त्या दृष्टीने आता पावले उचलली जात असून भविष्य काळामध्ये शहरवासीयांना पाणीटंचाई भासणार नाही याकडे नगरपालिका प्रशासन लक्ष देत आहे.
