श्रीरामपूर-
शहरात नगरपालिकेच्या निवडणुक प्रचाराने वेग घेतला असून प्रचारासाठी अवघे दोनच दिवस उरले असल्याने सर्व उमेदवारांची प्रचंड धावपळ उडाली आहे. महायुती कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले श्रीनिवास बिहाणी यांचे नाव अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी तुलनेने जरा कमी वेळ मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रचारातली ती उणीव भरून काढण्यासाठी खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरात भाजप राष्ट्रवादी युतीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.गेल्या दोन दिवसांत विखे पाटील पुन्हा दुसऱ्यांदा शहरात दाखल झाले आहेत. प्रचार संपण्याच्या दिवशीही ते पुन्हा शहरात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते शहरातील विविध प्रभागातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करत होते. त्यांच्या त्यांच्या प्रभागातील महत्वाच्या नागरी समस्यांवर विखे पाटील यांनी तात्काळ निर्णय घेत कार्यवाहीचे आश्वासन नागरीकांना दिले.विखे पाटील यांच्या धडक कार्यवाहीमुळे युतीच्या नेते मंडळींच्याही उत्साहाला उधाण आले. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्या तुलनेत प्रचारात पिछाडीवर पडलेल्या युतीच्या बिहाणी यांनी आता निवडणूकित चांगलीच झेप घेतल्याचे चित्र आहे.त्याला विखे पाटील यांचे सातत्याने शहरात सुरू असलेले दौरे कारणीभूत ठरत आहेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वार्ड क्रमांक दोन तसेच मिल्लतनगर भागामध्ये नागरिकांशी संवाद साधून झंझावाती दौरा केला.पहिल्यांदाच या भागात भाजपचे पुढारी या निमित्ताने दिसून आले.त्यांच्या या दौऱ्याला या परिसरातील नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. काजीबाबा रोड येथे त्यांनी उपस्थितांशी हिंदी आणि उर्दूतून संवाद केला.आजपर्यंत ज्यांना मतदान केले त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाही. संगमनेरमध्ये तर काँग्रेसचे पंजा चिन्हच गायब झाले आहे, असे सांगून दहशतीचे राजकारण कोण करतय हे आपण निवडणुकीनंतर पाहू.येणाऱ्या काळात या संपूर्ण भागाचा विकास करू.विकासाच्या पर्वाला आपण सुरुवात करू या. तुम्ही आम्हाला साथ द्या ‘इन्शाल्लाह मै सब करके दिखाऊंगा’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक,उमेदवार श्रीनिवास बिहानी,ताहेर बागवान, नितीन दिनकर,दीपक पटारे, साजिद मिर्झा, समीन बागवान,इंद्रनाथ पाटील थोरात,शरद नवले, केतन खोरे, अभिषेक खंडागळे,किशोर बनसोडे,खंडेराव सदाफळ,आसिफ पोपटिया,अकिल सुन्नाभाई आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिल्लतनगर येथे मतदारांशी संवाद साधताना नामदार विखे यांनी उपस्थित नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यास सांगितले. यावेळी संजयनगर, रामनगर, मिल्लतनगर, फातिमा कॉलनी या परिसरातील नागरिकांनी विशिष्ट महिलांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.
संजय नगर ईदगाह परिसरामध्ये सायंकाळ नंतर मुलींना बाहेर निघणे सुद्धा मुश्किल होते. रात्री मद्यपी लोक त्रास देतात. चोऱ्या होतात. पोलीस लक्ष देत नाही,अशा अनेक समस्या उपस्थित महिलांनी मांडल्या.इथून पुढे आता तुम्हाला हा सर्व त्रास होणार नाही, यासाठी पावले उचलले जातील असे सांगितले.तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना फोन करून संजय नगर परिसरातील नागरिकांना होणारा त्रास बंद करा असे आदेश विखे पाटील यांनी दिले. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना संपर्क करून गढूळ पाणी,गलिच्छ पाणी का येते याबाबत अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले.भाजी मंडई समोर विस्थापित झालेल्या बागवान लोकांना तसेच गांधी पुतळ्याजवळील दुकानदारांना लवकरच दुकाने दिली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विखे पाटील यांनी स्वतः शहर पिंजून काढण्याचे ठरवले असल्याने शहरातील प्रत्येक प्रभागाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
