श्रीरामपूर-
केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही. या शहराचे चित्र बदलण्यासाठी आपण भाजपला साथ द्यावी,असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी केले.
शहरातील विविध प्रभागामध्ये आयोजित प्रचारादरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. प्रभागातील प्रश्न नागरिक त्यांच्यासमोर मांडत आहेत. त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नाला ते उत्तरे देताना सत्ता आल्यानंतर काय उपाययोजना केल्या जातील याचा लेखाजोखा मांडला जात आहे. बिहाणी म्हणाले, शहरातील विस्थापित अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याला आपले प्राधान्या राहील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. पालकमंत्री विखे पाठीशी असल्याने रस्त्याची कामे करून शहर खड्डेमुक्त केले जाईल. समोर उभे असलेले उमेदवार सत्ताधारी पक्षाचे नसल्याने त्यांना निधी मिळविण्याची अडचण आहे. ते शहराचा विकास कसा करतील हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा. एक वर्षात मोठा निधी आताचे लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत. तर जे जिल्हा बँकेचे पाच वर्षांपासून संचालक आहेत त्यांनी काय काम केले, असा प्रश्नही बिहाणी यांनी उपस्थित केला.
शहराची पाणीपुरवठा योजना पालकमंत्री विखे यांच्यामुळे मंजूर झाली आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याला आपले प्राधान्य आहे. आपण उद्योजक असल्याने येथील तरूणांच्या रोजगाराची समस्या माहिती आहेत. त्यादृष्टीने एमआयडीसीमध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. शहरातील काही भागात चोऱ्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असून त्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सीसीटिव्ही बसविले जातील,असे आश्वासन बिहाणी यांनी दिले.यावेळी प्रास्तविक अतुल वढणे यांनी केले.
