श्रीरामपूर-
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या व शिवप्रेमींच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या व जिल्हाध्यक्ष सचीन गुजर यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने ‘शिवाजी महाराजांचा अवमान चालणार नाही’अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा. सभापती दीपक पटारे,भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी,संजय फंड, संजय छल्लारे,अशोक कानडे,महेंद्र पटारे,असिफ पोपटियाया,केतन खोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी अविनाश आदिक म्हणाले की, काही समाजकंटकाकडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जाणे हे अत्यंत संतापजनक आहे.त्या समाजकंटकांना कठोरातले कठोर शासन करावे.
निवडणूकित पराभव दिसू लागल्याने अशा घटना घडवून समाजात अशांतता पसरवण्याचा यांचा कट दिसत आहे.भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी म्हणाले की,शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांचे शिवप्रेमींकडून असेच हाल होतील. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.
जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर म्हणाले की,शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन व्हावे.
मा. सभापती दीपक पटारे म्हणाले की,40 वर्षे काँग्रेसची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न या मंडळींना सोडवता आला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटल्याने काँग्रेसच्या या लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे.त्यातूनच असे प्रकार घडवले जात आहेत.छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने झालेल्या मारहाणीचे आम्ही समर्थनच करतो.यानंतर महायुती व शिवप्रेमींच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित समाजकंटकावर तात्काळ कठोर कारवाई केली जावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
