श्रीरामपुर-
श्रीरामपूरात काँग्रेसचे स्थानिक पुढारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे समर्थन करीत आहेत.महाराजांचा अवमान झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलन करतात, याचे मला आश्चर्य वाटते.त्यांना मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटायला हवी.इतका निर्लज्जपणा मी आजवरच्या राजकारणा त कधी पहिला नाही,अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फटकारले.
विखे पाटील श्रीरामपुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,आपणावर जिल्ह्यात वातावरण बिघडवण्याचा होत असलेला आरोप पोरकटपणाचा असून विरोधकांना जिल्ह्यात सर्वत्र पराभव दिसत असल्याने आपल्यावर असे आरोप केले जात आहेत.
विरोधकांकडे आज कुठलेही काम राहिलेले नाही.केवळ टीकाटिप्पणी करणे हा एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे.श्रीरामपूर मध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीला जनतेचे पाठबळ मिळत आहे. स्वाभाविकच त्यामुळे विरोधकांची चिडचिड सुरू आहे.त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे माझ्यावर ते टीका करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.त्यांचा अवमान झाल्यामुळे त्याची प्रतिक्रिया जनतेतुन उमटली.याउलट देशपातळीवर असलेली काँग्रेसच्या नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी जनतेसमोर आली.बिहार राज्याच्या निवडणुकांनी ते स्पष्ट केले. आज जिल्ह्यात संगमनेरमध्ये काँग्रेसचे मोठे नेते निवडणूकित पक्षाचे चिन्ह घ्यायला तयार नाहीत.ही मोठी शोकांतिका आहे.याचा अर्थ पक्ष संपुष्टात आलेला आहे.आता हा पक्ष फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुरता राहतो की काय अशी शंका यायला लागली आहे.
