श्रीरामपूर-
शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपनीकडून संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून अखेरीस त्याच शेतकऱ्यांना गंडा घालून ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.याप्रकरणी २ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ ट्रॅक्टर व २ मोटारसायकलसह ७१ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.
प्रस्तुत प्रकरणी हकीगत अशी की, फिर्यादी यांना आरोपी भालचंद्र अशोक साळवी, रा.वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर व त्याचे साथीदार यांनी तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यास मदत करतो असे सांगुन नवीन ट्रॅक्टरचे डाऊन पेमेंट १,००,०००/- रुपये मी भरतो. तसेच सदरचे ट्रॅक्टर तुमचे नावावर घेवुन देतो. ट्रॅक्टर आल्यनंतर तुम्हाला वाटल्यास ट्रॅक्टर माझेकडे कामाला लावा. मी तुम्हाला त्या मोबदल्यात ८०,०००/- रुपये देतो. तसेच कर्जाचे पुढचा ६ महिन्याचे हफ्ते देखील भरतो.सहा महिन्यासाठी ट्रॅक्टर वापरण्याचे मोबदल्यात तुम्हाला ३०,०००/- रुपये महिना देतो, असे अमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, त्यांचे नावावर असलेल्ल्या शेतीचे उतारे, रेशनकार्ड असे घेवुन त्यांना L&T फायनान्स कंपनीचे लोन करुन दि.०४/०६/२०२५ रोजी ट्रॅक्टर श्री.महाकाली शोरुम, श्रीरामपुर येथुन घेवुन दिले होते.सदरचे ट्रॅक्टर दि. ०६/०६/२०२५ रोजी आरोपी यांनी फिर्यादीची फसवणुक करून स्वतकडे नेले.तसेच त्यांच्यात ठरल्याप्रमाणे ८०,०००/- रुपयेही फिर्यादीस दिले नाहीत व फिर्यादीचे फोन उचलने बंद केले. त्यावेळी फिर्यादी यांना आपली फसवणुक झाल्याचे समजल्याने त्यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे दि.२९/१०/२०२५ रोजी गु.र.न. ४०१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१६ (२), ३९८ (४) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनिय माहिती तसेच गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषनावरुन सदर आरोपी हा महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, बिहार राज्यात नेहमी ये जा करत असतो असे समजले. त्याच्यावर पाळत ठेवली असता तो दि. ०४/११/२०२५ रोजी अहिल्यानगर येथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भालचंद्र अशोक साळवी, रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर,अभिजित सुनिल भांडवलकर, वय ३२ वर्ष, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.तसेच सदरचे ट्रॅक्टर हे करण रजपुत, सिल्लोड, जि.संभाजीनगर यांना ४,००,०००/- रुपये किंमतीला विकला असे सांगीतले. तसेच त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची फसवणुक केली असल्याचे सांगितले. या टोळीने आतापर्यंत ९ ट्रॅक्टर व २ मोटार सायकल अशा प्रकारे परस्पर विकल्या आहेत. सदर ९ ट्रॅक्टर पैकी १ शिर्डी, ३ अहिल्यागनर, २ श्रीगोंदा, २ नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे, १ सिन्नर, जि. नाशिक तसेच मोटार सायकल पैकी १ श्रीगोंदा व १ नारायणगाव या ठिकाणी वेगवेगळे पथके पाठवुन खालील इसमांकडुन ताब्यात घेण्यात आल्या आहेत.वरील नमुद एकुण ७१,७०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांचे इतर साथीदार व साक्षीदार यांचेकडे चौकशी चालु आहे. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. दिपक सरोदे, राजुर पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनावाखाली कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लॉढे, पोहेकॉ सचिन धनाड, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर कार्यालयातील पोहेकॉ दत्तात्रय मेंगाळ, पोना बापुसाहेब हांडे, पोकॉ राहुल सारवंदे, राजुर पोलीस स्टेशन चे स.पो.नि. दिपक सरोदे, पोहेकॉ नरोडे, पोकॉ रत्नपारखी, पोकों परते, शिडी पोलीस स्टेशनचे पोसई सागर काळे, पोहकों संदिप उदावंत तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे, पोकों अरुण पवार, पोकों मयुर तोडमल असे वेगवेगळे पथक तयार करुन करण्यात आली आहे.

