श्रीरामपूर-
श्रीरामपूरची जनता स्वाभिमानीच आहे,परंतु इथल्या ज्या राजकारण्यांनी आपला स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी श्रीरामपूरच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणे हास्यास्पद असल्याचा खोचक टोला मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला.
हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवरील ६०१ घरकुल योजनेच्या शुभारंभानिमित्त बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला.यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप आणि ११ लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. विखे यांनी श्रीरामपूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय शेरेबाजीवर जोरदार हल्ला चढवला.
मा.खा.डॉ. विखे पुढे म्हणाले की, तुमच्या तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवरच चालते.तेही संध्याकाळी.फक्त मोबाईलवर राजकारण करणाऱ्यांना जनता आता चांगलीच ओळखायला लागली आहे.
गेल्या २५ वर्षांत सत्तेत राहिलेल्या लोकांना जनतेने आता प्रश्न विचारले पाहिजेत की तुम्ही आमच्यासाठी काय केलं? हे इतके दिवस सुरू असलेले गलिच्छ राजकारण बदलायचे असल्यानेच मी श्रीरामपूरात आलो आहे.लोकसभेत मला पाडणाऱ्यांना मी पाडून पुन्हा तुमच्यासमोर उभा आहे. कारण माझ्या मागे जनतेचा आणि गोरगरिबांचा आशीर्वाद आहे.इथे काल गोड बोलणारे आज शिव्या देतात आणि काल शिव्या देणारे आज गोड बोलतात.जसा पिक्चर तिकडं (संगमनेर) बदलला आहे, आता तसाच तो इकडंही बदलणार आहे.ज्याला मला मोबाईलवर जितके ट्रोल करायचे आहे तितके त्याला करू द्या.आपण विकास कामातून उत्तर देऊ.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक प्रश्नासाठी आजही जनतेला आंदोलन करावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी, घरकुलांसाठी लोकांना संघर्ष करावा लागला. पण आता संघर्ष करावा लागणार नाही. तालुक्यातील एकही प्रश्न येत्या चार वर्षांत प्रलंबित ठेवणार नाही.शेती महामंडळाच्या जागेवर सर्वसामान्य माणसाला घर मिळावं, यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. इथे दलित वस्ती जाहीर करून त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देऊ.खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला तसा आकारी पडीक जमिनीचा प्रश्न लवकरच सोडवू.सद्या तो राज्यपालांच्या पातळीवर मांडला असून, पुढील आठ महिन्यांत तो सुटेल,असेही खा. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी सुजय विखे यांना नगरपालिका निवडणूक जाहीर झाली असून तुम्ही म्हटले तो राजकीय भूकंप केव्हा होणार असे छेडले असता ते म्हणाले की जसा भूकंप हा सर्वसामान्य जनता शांत झोपेत असताना होतो तसाच आमचा भूकंपही सर्व शांत असल्यानंतर नक्की होईल.झाल्यावर आपल्या सर्वांना समजेलच.आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत परंतु इथे सेना-राष्ट्रवादी मध्ये नेतेच जास्त झालेत. त्यामुळे कुणाशी बोलावे हे कळत नाही.माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या तरी कुठलीच माहीती आपल्याकडे नसून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमात सगळं नियोजन मीच केलं त्यावर अनेकांनी टीका केली परंतु ती माझी स्टाईल आहे,श्रीरामपूरसाठी नवीन आहे परंतु पुढे सर्वांना त्याची सवय होईल,असेही विखे यांनी समाजमाध्यमातून ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावले.
याप्रसंगी यावेळी जिल्हाध्यक्ष नितिन दिनकर, मा. सभापती दिपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शरद नवले, गिरधर आसने, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब बांद्रे, हरेगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन, शंकरराव मुठे, अनिल भनगडे, गणेश मुदगुले, राधाकिसन आहेर आदी उपस्थित होते.
