श्रीरामपूर-नितीन शेळके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या गेल्या ४० वर्षांपासूनची श्रीरामपूरकरांच्या स्वप्नपूर्तीची आज फलश्रृती झाली. सुमारे २० मिनिटांहून अधिकाकाळ सुरू असलेल्या फटाक्यांची अतिषबाजी व रोषणाईत डोळ्यांचे पारणे फेडणारा हा नयनरम्य सोहळा हजारो शिवप्रेमींनी आज अनुभवला. शिवसेना उपनेते,राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील भाजीमंडई समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण झाले.
यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, मा.खा.डाॅ.सुजय विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, महंत अरुणनाथगिरी महाराज, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, आशिष धनवटे, राकेश न्याती, केतन खोरे, सागर बेग, राजेंद्र देवकर, अशोक कानडे, प्रदीप वाघ, बाबा शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील सर्व प्रभागातून डोलीबाजा लावून भगव्या टोप्या, ध्वज हाती घेऊल शिवप्रेमी दुपारी तीन वाजेपासून हजेरी लावत होते. अनेक भागातून दुचाकी रॅली काढण्यात आल्या. व्यासपीठासमोर तरूण-तरूणींनी शिवकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली.

सायंकाळी साडेवाजात मंत्री सामंत व विखे पाटील कार्य़क्रमस्थळी दाखल झाले. यावेळी छत्रपतींच्या स्मारकासाठी आजपर्यंत योगदान देणाऱ्या आजी-माजी आमदार खासदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सामंत यांच्या हस्ते कळ दाबून अनावरण व लोकार्पण झाले. डाॅ. सुजय विखे यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे करण्यात आलेली फटाक्यांची आतिषबाजी उपस्थितांचे डोळ्यांचे पारणे पेडणारे ठरले. महाराजांच्या पुतळ्यावरील अच्छादन बाजूला होताच श्रीरामपूरकरांनी जय भवानी, जय शिवाजी असा एकच जल्लोष केला. यानंतर सामंत, राधाकृष्ण विखे व डाॅ. सुजय विखे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी चित्रकार रवी भागवत यांनी साकारलेल्या ३५० फूट आकारातील तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले.
या सोहळ्यातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र मंत्री सामंत, विखे यांच्या हस्ते रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन, भीमा बागूल यांच्यासह पुतळा समितीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. डाॅ.आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या वाॅक थ्रूचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण कार्य़क्रमाचे नियोजन डाॅ.सुजय विखे यांनी स्वतः माईक हातात घेत पार पाडले. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर तालुक्याचे प्रलंबीत असलेले प्रश्न आपण आपल्यापरीने सोडविण्याच प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याने श्रीरामपूरकरांचा एक संघर्ष संपला असला तरी आता आपल्या सर्वांच्या साथीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची पूर्ती केली जाईल. तसेन नाॅर्द्रन ब्रांच ते महात्मा गांधी चौकांपर्यंतच्या रस्त्यासाठी माजी खासदार लोखंडे यांनी पाच कोटी, तर पालकमंत्री विखे यांनी जिल्हा नियोजनातून दोन कोटी रूपये या रस्त्यासाठी मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले.


