श्रीरामपूर-नितीन शेळके
गेल्या अनेक दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात व्हावा हे श्रीरामपूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे,अशा भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या.
शिवसेना उपनेते,राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील भाजीमंडई समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण आज थाटामाटात संपन्न झाले. या ऐतिहासिकसोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.ना.विखे पाटील पुढे म्हणाले की,शिवरायांच्या पुतळ्याच्या या अनावरण सोहळ्यासाठी श्रीरामपूरकरांची व शिवप्रेमींची ही उपस्थिती पाहता श्रीरामपूरचे नागरिक हे विकासासोबतच आहेत याची खात्री आपल्याला पटली आहे.गेल्या कित्येक दशकांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती झाल्याने आज अत्यंत समाधान वाटत असल्याचेही ना. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

