श्रीरामपूर-
आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, सुरेश गलांडे, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, बाबासाहेब काळे, अशोक बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, आपली आई ती आपलीच असते; दुसऱ्याची आई कितीही चांगली वाटत असली तरी ती आपली होऊ शकत नाही. आपली झोपडी आपली असते; दुसऱ्याचा बंगला आपल्या काय कामाचा? कोणत्याही कारखान्याचा विकास होण्यासाठी कामगार, संचालक, शेतकरी यांचे योगदान महत्वाचे असते. सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो दुसऱ्यांच्या मुखात घास घालतो त्याला देव म्हणतात आणि जो दुसऱ्यांच्या तोंडातील घास काढतो त्याला दानव म्हणतात. आपण देव राहिले पाहिजे. मराठवाड्यातील अनेक कारखाने बंद पडली आहेत, अशी परिस्थिती आपली होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मुरकुटे म्हणाले, कारखान्याची सत्ता आपल्या ताब्यात आली तेव्हा कारखान्याची गाळप क्षमता १५०० मेट्रिक टन होती. ती २७०० पर्यंत नेली आणि आज कारखान्याची गाळप क्षमता ४२०० टनापर्यंत आहे. आज ऊस भावाचे कारण पुढे करत बाहेरील कारखान्यांना व खासगी कारखान्यांना येथे काही मंडळी ऊस पुरवठा करत आहेत. राहुरीत जाऊन तुम्ही काय परिस्थिती आहे ते पाहून यावे. यावेळी आपल्याकडून ऊस नेऊन गाळप केले. बाहेरील लोकांना तुम्ही ऊस देता, त्यांनी येथील बंधाऱ्यासाठी चिमूटभर सिमेंट तरी दिले का याचा विचार करायला पाहिजे. त्यांनी तुमच्या भागात पाणी वाढविले का, उलट लिफ्टद्वारे पाणी उचलले आहे. त्यामुळे अशोक कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आपल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरज मुरकुटे यांनी आभार मानले
