श्रीरामपूर-नितीन शेळके
श्रीरामपूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचा चेहरा राहिलेले,भाजपच्या प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष,हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांनी आपल्या सुमारे दोनशेहुन अधिक कार्यकर्त्यांसह ठाणे येथे स्व. गंगुबाई शिंदे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशाने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली असून भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.पक्षाने चित्ते यांच्या रूपाने शहरातला मोठा ओबीसी चेहरा गमावला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.या प्रवेशामुळे नगरपरिषद निवडणूकितील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.दरम्यान शिंदे यांची शिवसेना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असून प्रकाश चित्ते हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.भाजप पक्षांतर्गत कुरघोड्या आणि गटबाजीमुळे चित्ते यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा त्यांच्या शिवसेनेतील प्रवाशानंतर सुरू झाली आहे.
काल दि.१८ रोजी सायंकाळी मुंबई येथे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत प्रकाश चित्ते यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना प्रवेश निश्चित झाला होता.आज दि.१९ रोजी ठाणे येथे त्यावर शिक्कामोर्तब झाले.याप्रसंगी तालुका संपर्कप्रमुख जनार्दन लाल पगार,संजय पांडे, राजेंद्र कांबळे, माजी नगरसेवक किरण लुनिया,बबन मुठे, सोमनाथ कदम, संजय रुपटक्के आदींसह सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रकाश चित्ते यांच्या प्रवेशामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.चित्ते हे अहिल्यानगर जिल्ह्यात कडवट हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केलेले आहे.येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक आपण कुठल्याही परिस्थितीत लढवणारच असा निर्धार त्यांनी नुकताच व्यक्त केला होता.आता शिंदे शिवसेना स्वतंत्ररित्या निवडणूकिला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.यात प्रकाश चित्ते हेच नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार असण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.दरम्यान प्रकाश चित्ते यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसमवेत काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या नेते मंडळींकडून समर्पित भाजप कार्यकर्त्यांवर श्रीरामपूर तालुक्यात कसा कसा अन्याय केला जात आहे,हे सांगितले होते. त्यावर महाजन यांनी त्यांना सर्व काही ठीक होईल असे आश्वासन दिले होते.त्यांनंतर थोड्याच दिवसांत प्रकाश चित्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.या आगोदर मा.आ.भानुदास मुरकुटे, श्रीराम संघाचे सागर बेग,मा.उपनागराध्यक्ष संजय छल्लारे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणाऱ्या निवडणुकांच्या काळात तालुक्यातील या सर्व नेत्यांची मोट कशा पद्धतीने बांधतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
