श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यात भाजप पक्षासाठी काम करणाऱ्यांपेक्षा पक्षाला कोणतेही योगदान नसलेल्या व्यक्तींना महत्त्व दिले जात आहे.तर दुसरीकडे प्रकाश चित्ते यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे.त्यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक
आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढवणार आहोत,अशी भूमिका श्रीरामपूर येथील भाजपच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडली.मुंबई येथे सेवासदन बंगल्यावर भाजप मधील विविध कार्यकर्त्यांसमवेत प्रकाश चित्ते यांनी ना.गिरीश महाजन यांची भेट घेतली.यावेळी चर्चेनंतर ना.गिरीश महाजन यांनी ‘काळजी करू नका, सर्व ठीक होईल’ असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती चित्ते यांनी दिली.याप्रसंगी भाजप नेते सुनील मुथ्या, माजी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, माजी तालुकाध्यक्ष बबन मुठे, सुरेश आसने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीवेळी झालेल्या चर्चेत श्रीरामपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षासाठी गेली 35 वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही झटत काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदापासून, जिल्हाध्यक्षपदापर्यंत अगदी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदापर्यंतही चित्ते यांना अन्याय सहन करावा लागत आहे,असे यावेळी शिष्टमंडळाने ना. महाजन यांना सांगितले. याशिवाय, महाराष्ट्रात विधानसभेच्या वेळी पक्षाच्या विरोधात उमेदवारी केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई न होता. श्रीरामपूर तालुक्यात भाजपचा उमेदवार नसतानाही केवळ नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या सांगण्यावरून प्रकाश चित्ते यांना पक्षातून काढण्यात आले.तसेच अलीकडेच श्रीरामपूरमध्ये काँग्रेसमधील दहा नगरसेवकांना पक्षात घेतले गेले आहे. त्यांना नगराध्यक्षपदाचा शब्द देण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
