श्रीरामपूर –
दारूबंदी आणि मटका व्यवसाय बंदीसाठी भोकर येथील माताभगिनींनी रुद्रावतार धारण करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यासह ग्रामपंचायतीवर सोमवार (दि. ८) रोजी मोर्चा काढला.याप्रसंगी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले की, 1 सप्टेंबर च्या ग्रामसभेत महिलांच्या सह्या घेवून दारूबंदी चा ठराव घेण्यात आला आहे.तरीही त्यावर कारवाई झालेली नाही.त्यामुळे आज
महिलांनी दारूबंदीसाठी प्रशासनाला जागे केले. त्यांनंतर श्रीरामपूर येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तातडीने भोकर येथे दाखल होत कारवाई सुरू केली. परंतू सकाळपासून येथील महिला प्रशासनाच्या दारात गेल्याने सर्वच अवैध विक्रेते सावध झाल्याने येथे दोन गोण्या रिकाम्या बाटल्याशिवाय पोलिसांच्या काहीच हाती लागले नाही. परंतु तरीही ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करत यापुढे सापळा रचून कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्रीरामपूर येथे आमदार हेमंत ओगले यांनीही या महिलांना याच आठवड्यात दारूबंदी करणार असल्याचे आश्वासन दिले.सुरवातीला महिलांनी एकत्र येत प्रथम भोकर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेत आक्रोश व्यक्त केला. तेथून तालुका पोलीस ठाणे गाठले, त्यानंतर श्रीरामपूर तहसील कार्यालयात आमदार ओगले यांनी जलजीवन व पाणी पुरवठा या विषयावर आयोजित आमसभेत या महिलांचा मोर्चा दाखल झाला. यावेळी अनेक महिलांनी उपस्थितांसमोर आपल्या समस्या मांडल्या.त्यांनतर पोलीस प्रशासन जागे झाले.याप्रसंगी सरपंच शितल पटारे, उपसरपंच संदिप गांधले, आशा अंकुरच्या सिस्टर प्रिस्का, रेखा थोरात, सुनिता आहेर, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, प्रताप पटारे, विजय अमोलिक, वेणुनाथ डूकरे, मारूती आहेर, रमेश भालके, अंबादास काकडे, राजू लोखंडे, भाऊसाहेब डुकरे, प्रकाश चौधरी, अतुल आबुज, रामदास ढोकणे, भानुदास शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
