श्रीरामपूर-
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील काम वेगाने पार पाडण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. यात अहिल्यानगर–मनमाड, पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर, नांदूर शिंगोटे–कोल्हार, कोपरगाव–सावळीविहीर तसेच सुरत–चेन्नई या मार्गांवरील कामांचा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.या बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन, येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, सदर कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत, यावर विशेष भर देण्यात आला.यासोबतच अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील काम वेगाने पार पाडण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्याच्या देखील सूचना ना डॉ विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या.या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्तता झाल्यास जिल्ह्यातील व्यापार व औद्योगिक विकास आणखी वेग घेईल,अशी खात्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.या बैठकीस अहिल्यानगर आणि नाशिक येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
