श्रीरामपूर-
खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे.ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे ते मंत्री असल्याने त्यांना कुठल्याही अडचणी येत नाहीत,अशी टीका माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता केली.परंतु त्यांचा रोख कुणाकडे आहे हे उपस्थितांच्या लक्षात आल्याने एकच खसखस पिकली.तसेच भविष्यात मतदारसंघ खुला होईल.त्यावेळी आम्ही चुकीचे वाटत असलो, तर दुसऱ्या व्यक्तीला निवडून द्या, पण तो आपल्या तालुक्यातीलच निवडून द्या, बाहेरच्याला निवडून देऊ नका,अन्यथा आपल्याला गुलामगिरीत दिवस घालवावे लागतील,असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.यापूर्वी तत्कालीन मंत्री स्व. गोविंदराव आदीक यांच्या माध्यमातूनही अनेक भरीव कामे आपल्या तालुक्यात राबविली गेल्याची आठवण मुरकुटे यांनी यानिमित्ताने काढली.
टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी मुरकुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदेव साळुंके होते. माजी संचालक एकनाथ लेलकर, शिवाजी शिंदे, संचालक नीरज मुरकुटे, बाजार समिती संचालक मयूर पटारे, दत्तात्रय नाईक, पुंजाहरी शिंदे, गणेश छल्लारे आदी प्रमुख उपस्थित होते.
मुरकुटे पुढे म्हणाले की,राखीवमुळे जो आमदार निवडून येतो तो प्रभावशाली नसतो.आपल्या हातात कारखाना सोडला तर दुसरी सत्ता नाही. राहुरीचा कारखाना बंद पाडला तसा अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव सध्या सत्तेत असणाऱ्यांचा आहे. ही कामधेनू जपण्यासाठी आम्ही जुन्या पिढीतील लोकांनी संघर्ष केला आहे. हीच आपली कामधेनू टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी ‘अशोक’ च्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ‘अशोकला’च उस द्यावा.श्री. मुरकुटे पुढे म्हणाले जलपूजनाचा कार्यक्रम हे फक्त निमित आहे. मात्र, अशोक कारखान्याबद्दल चुकीची माहिती सभासद शेतकऱ्यांमध्ये पोहचवली जात आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळावी, यानुसार आजची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर अशोक ज्यावेळी आमच्या ताब्यात आला, त्यावेळी या कार्यक्षेत्रात फक्त पस्तीस हजार टन उस होता. अशा परिस्थितीत कारखाना कसा चालवायचा, असा प्रश्न समोर आला होता. काही जणांनी कारखाना बंद करण्याचा सल्लाही त्यावेळी दिला. मात्र, आपण यावर मात करत बाहेरून उस आणून हा कारखाना चालविला. त्याचबरोबर मी १९८० साली आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून गोदावरी,प्रवरा नदीबर कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची मालिका उभारून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम युद्धपातळीवर राबविली. आपण आपल्या भागात ओढे-नाले तसेच जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे बंधारे व तळे बांधले. व त्याचाच परिपाक म्हणून या दोन्ही नद्यांचे कार्यक्षेत्र ऊसाचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागले. अशोक पेक्षा दुसरे कारखाने भाव जास्त देत आहेत. म्हणून बाहेर ऊस दिला गेला. परंतु आपल्या शेजारील मुळा, ज्ञानेश्वर यांचे गाळप आपल्यापेक्षा जास्त असूनही त्यांचा भाव आपल्या बरोबरीने म्हणजेच २७०० रुपये आहे. काही कारखान्यांना दारू निर्मितीची जोड असल्याने ते जास्त भाव देतात. आपल्या कारखान्याचे गाळप साडेचार लाख टन झाले आहे. गाळप कमी झाल्यास हा कारखाना चालणार नाही.यावेळी माजी उपसरपंच पाराजी पटारे, भाऊसाहेब पटारे, संजय पटारे, लक्ष्मण सटाले, भागवत रणनवरे, संजय रणनवरे, शिवाजी पटारे, दत्तात्रय पटारे, रावसाहेब वाघुले, मच्छिंद्र कोकणे, भास्कर कोकणे, दत्तात्रय बोडखे, सुनिल बोडखे, सुनिल त्रिभूवन, जालींदर वेताळ, अमोल पटारे, नानासाहेब लेलकर, अमोल कोकणे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय कोकणे, उत्तम पवार, शिवाजी नवले आदी सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.
