श्रीरामपूर-नितीन शेळके
महाराष्ट्राच्या राजकाराणातील एक अत्यंत प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव अधोरेखित झाले आहे.त्यांच्या निमित्ताने हा मान अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन त्यासाठी मोठे निमित्त ठरले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अवघ्या काही दिवसात त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी यशस्वी करून दाखवित मराठा समाजाचीही मने जिंकली आहेत.आज मराठा आंदोलकांनी विखे पाटील यांचे मुंबई येथे आभार मानत त्यांच्यावर गुलालाची मुक्त हस्ते उधळण केली.

विखे पाटील यांनी सातत्याने अतिशय संयमाने सर्वाशी संवाद साधत 3 ते 4 दिवस घेतलेल्या मेहनतीचे यश जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यात झाले आहे.या निमित्ताने मुंबई मध्ये गणेश उत्सवात निर्माण झालेल्या पेच प्रसंगातुन त्यांनी सरकारलाही लीलया बाहेर काढले आणि मराठा समाजालाही न्याय मिळवून देत आंदोलकांचे समाधान केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री विखे पाटील यांची नियुक्ती केली होती.समितीच्या सर्व सदस्यांना एकत्रित करून त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागणीवर कायदेशीर दृष्टीने अभ्यास करून त्याला कायदेशीर आधार देण्यासाठी त्यांनी बैठकांचा सिलसिला सलग सुरू ठेवला.परिस्थिती जिकरीची आणि संवेदनशील होती तरी त्यांनी त्रागा न करता आंदोलकांशी अतिशय उत्तम समन्वय ठेवला. आधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन आंदोलकांच्या मागण्यांवर समाधान शोधण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागली.मंत्री विखे पाटील यांच्यातील नेतृत्व गुणांची मराठा आंदोलनाच्या निमिताने पुन्हा एकदा राज्याला प्रचिती आली.त्यामुळेच मनोज जरांगे यांनीही आजच्या मराठा आंदोलनाच्या यशस्वी होण्याचे श्रेय निर्विवादपणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्व आंदोलकांसमक्ष दिले.
