श्रीरामपूर–
निवडणूक शाखेतील महसूल सहाय्यक ओम रामजी खुपसे यांची बदली शनी शिंगणापूर येथे झाल्याने श्रीरामपूरमधील बी.एल.ओ. वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे. या बदलीमुळे निवडणूक कामाचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त करत, बी.एल.ओ. समन्वय समितीने या आशयाचे निवेदन देत शुक्रवारी (दि. ०९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. यावेळी अनेक बी.एल.ओ. उपस्थित होते.
सध्या मतदार यादी पडताळणी, ‘एस.आय.आर’ आणि तांत्रिक स्वरूपाची क्लिष्ट कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. खुपसे यांनी आजवर ही गुंतागुंतीची कामे अत्यंत सोप्या पद्धतीने हाताळून बी.एल.ओ.ना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. “काळजी करू नका, आपण मार्ग काढू” असा धीर देणारा अधिकारी गेल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेचे गणित बिघडू शकते, अशी भावना बी.एल.ओ. बांधवांनी व्यक्त केली आहे.
विधानपरिषद, लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद निवडणुकांतील त्यांचे चोख नियोजन पाहता, प्रशासकीय हितासाठी ही बदली तातडीने रद्द करून त्यांची पुनर्नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी २२० – श्रीरामपूर (अ.जा) मतदारसंघातील बी.एल.ओ.नी केली आहे. आता जिल्हाधिकारी या भावनेची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
