श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुका व शहरांमध्ये बिबट्यांची संख्या ५६ असल्याचा दावा भारतीय वन्यजीव संस्थेने केला आहे. सहा महिन्यात बिबट्याची संख्या शंभरी पार करील,असे वाटते. सध्या ऊसाची तोडणी सुरू असल्याने बिबटे लपण्याचे नवीन ठिकाण शोधत आहे. त्यामुळे श्रीरामपूर परिसरात बिबटे फिरताना दिसतात. शहरात म्हाडा कॉलनी, पाटनी मळा, मोरगे वस्ती, गोंधवणी परिसर तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच रहदारीच्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन दररोज होत आहे. बिबटे लपण्यासाठी झाडांचे जंगल शोधत आहे, शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक भागांमध्ये खाजगी व सरकारी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर वेड्या बाभळीचे झाडे वाढली आहेत, त्यामुळे बिबटे शहरात येताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, रात्री घरासमोर अथवा रस्त्यावर खेळणारी लहान मुले यांना पालक घराच्या बाहेर जाऊ देत नाही, ऊस शेतीच्या परिसरात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ऊस क्षेत्रात पाण्याचे साठे, ऊसामुळे वास्तव्यासाठी, प्रजननासाठीची अनुकुलता आणि ऊसालगतच शिकारीसाठी शेळी, मेंढी, वासरे, कोंबड्या आदींची उपलब्धता. या सर्व प्रकारच्या अनुकुलतेमुळे बिबटे बागायती भागात स्थिरावले आहेत. बिबटे पुन्हा जंगलाकडे जातील अशी स्थिती नाही. त्यामुळे बिबटे यापुढील काळात नागरी वसाहतीत मुक्कामी राहणार असल्याने ही कायमची समस्या ठरणार आहे.
भक्ष्य शोधान्यासाठी बिबट्यांनी शहरी भागातील नागरी वसाहतीत मुक्त फिरताना दिसत आहे. बिबट्यांना पकडण्यासाठी राज्य सरकारने मोहीम हाती घेतली आहे, स्थानिक पातळीवर काही जागरूक नागरिकांनी आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण पाटील सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याशी संपर्क करून भविष्यात जीवित हानी टाळण्यासाठी व बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी शहरात खाजगी व सरकारी जागेवर तयार झालेले झाडाचे जंगल त्वरित काढावे, अशी मागणी केलेली आहे.
