श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील एसटी महामंडळाची जमीन ही शासनाची असून यासंबंधी ७/१२ आणि ८ अ वर काही नोंदी राहिलेल्या असतील तर त्या १ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करून एस टी महामंडळाच्या बस स्टॅन्ड चे काम तातडीने चालू करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत,अशी माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली.श्रीरामपूर येथील बस स्टँडच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सदर जागेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आ. ओगले यांनी तातडीने परिवहन मंत्री सरनाईक यांना पत्र लिहून बैठकीचे आयोजन करण्याचे विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज मंत्रालय येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या दालनामध्ये सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस राज्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक, जिल्हा भुमी अभिलेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सदर कामाचे ठेकेदार उपस्थित होते. बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी मंत्री सरनाईक यांना निदर्शनास आणून दिले की श्रीरामपूर येथे बस स्टँडचे काम मंजूर असून परंतु जागेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे सदरचे काम रखडले आहे याचाच फायदा घेऊन काही गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे ताबा मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा भुमिलेख अधिकारी यांना तातडीने सदर जागेच्या संदर्भातील उताऱ्यांवर शासनाच्या नोंदी करण्याचे आदेश दिले.एक नोव्हेंबर पर्यंत सदर कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच श्रीरामपूर येथील बस स्टॅन्ड चे पुनर्बांधणीचे काम चालू होणार आहे. तसेच सदर कामात कुणी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मंत्री महोदयांनी दिल्या आहेत.
