श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू असून, सदर रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत विविध पक्षांनी उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीरे यांना निवेदन दिले.शहरातील छत्रपती शिवाजी रोड, बेलापूर रोड, संगमनेर रोड, गोंदवणी रोड, नेवासा रोड आदी प्रमुख रस्त्यांवर श्रीरामपूर नगर परिषदेने काही ठेकेदारांना डांबरीकरणाचे ठेके दिले होते. परंतु अवघ्या चार-पाच महिन्यांतच या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महिला, वृद्ध, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), जिल्हाकार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशन, अध्यक्ष गौतम उपाध्ये युवा स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष विवेक माटा व राष्ट्रीय जनसेवा पार्टी जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकारी तापकीरे यांची भेट घेऊन ठेकेदारांकडूनच पुन्हा डांबरीकरण करून घेण्याची आणि त्यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की, काही ठेकेदारांनी तीन कोटी रुपयांची कामे मिळवून देखील शिल्लक दहा-पंधरा पावले राहिलेले काम करायचे त्यांच्या जीवावर आले होते. त्यांना संबंधित अधिकाऱ्याने विचारले असता ते म्हणाले. “आमचा ठेका फक्त येथेपर्यंतच होता,” असे कारण सांगत पुढील काम करण्याचे टाळण्यात आले आहे, हे अत्यंत गंभीर आहे.नगरपालिकेने या खड्ड्यांवर तात्पुरता उपाय म्हणून मुरूम टाकण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मुरूम टाकल्याने खड्डे पुन्हा पडणारच आहेत. त्यामुळे योग्य दर्जाचे डांबरीकरण करूनच खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा नगरपरिषदेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
