श्रीरामपूर –
शहरातील व ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी सरसकट मराठा आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.त्याकरिता येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने करण्यात आले आहे.मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात व ग्रामीण भागात बैठक घेऊन जनजागृती केली जात असून त्याकरिता अखंड मराठा समाजाचे मराठा सेवक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबई मोर्चा संदर्भात माहिती देऊन श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी भविष्यातही एकत्रित राहून विविध उपक्रम साजरे करण्याचे आवाहन करून सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून सरसकट मराठा बांधवांना आरक्षण मिळावे याकरिता ही शेवटची लढाई आहे. त्याकरिता दिनांक २७
ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून निघणाऱ्या या मोर्चात लाखो समाज बांधव सामील होणार असून दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदान,मुंबई येथे हा मोर्चा पोहोचणार आहेत.या मोर्चात श्रीरामपूर तालुक्यातील मराठा समाजाबरोबरच इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याकरिता अखंड मराठा समाज श्रीरामपूर च्यावतीने श्रीरामपूर शहरात विविध भागात तर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये नियोजन बैठक घेतली जात आहे.या बैठकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाकरिता काही बांधव दि.२७ ऑगस्टला श्रीरामपूर वरून अहिल्यानगर येथे सहभागी होणार आहेत तर ग्रामीण भागातील काही बांधव ट्रॅव्हल्स बस व खाजगी वाहनांनी दि.२८ ऑगस्ट रोजी शिवनेरीहून मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
