श्रीरामपूर-
भारतीय राज्यघटनेचे सार असलेले “संधीची व दर्जाची समानता” हे तत्त्व प्रत्यक्षात आणत श्रीरामपूरच्या आझाद मैदानातील सार्वजनिक गणेश मंडळाने एकल महिलांना गणेशोत्सवानिमित्त श्रींची आरती करण्याचा मान देत त्यांचा सन्मान केला.
मंडळ यंदा पंचाहत्तरावे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. जुन्या रूढी, परंपरांमुळे विविध उत्सव व इतर सोहळ्यांमध्ये एकल महिलांना सहभागी करून न घेता त्यांची काहीही चूक नसताना अंधश्रद्धेपायी अशुभ समजून विविध घरगुती व सामाजिक, धार्मिक सोहळ्यांपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल महिला समितीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक गणेश मंडळांच्या सहकार्याने एकल महिलांच्या हस्ते गणफतीची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
त्यानुसार श्रीरामपूर ( जि. अहिल्यानगर) येथील आझाद मैदानातील पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून यंदा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती एकल महिलांच्या हस्ते करून एकल महिलांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांना एकल महिलांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल मंडळाच्या वतीने सूर्यकांत सगम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य बाळासाहेब जपे, साऊ एकल महिला समितीचे मुकुंद टंकसाळे, गलांडे पाटील विद्यालयाच्या उपशिक्षिका कल्पना जानराव साळवे तसेच मंडळाचे पदाधिकारी मनोजकुमार नवले, सूर्यकांत सगम, अनिल छाबडा, इसाक पटेल, किशोर फाजगे, वैभव सूरडकर, प्रमोद पत्की, कुणाल करंडे, तेजस सूरडकर, संजीव पगारे आदी उपस्थित होते. श्रीपाद गोऱ्हे यांनी या विधी सोहळ्याचे पौरोहित्य केले.
