श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरामध्ये काल नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर त्याचप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्याखाली कारवाया करण्यात आल्या.शहरामध्ये अनेकदा मूळ कंपनीचे सायलेन्सर बदलून विनापरवानगी मोठ्या कर्णकर्कश असे आवाज करणारे सायलेन्सर, फटाके फोडणारे सायलेन्सर गाड्यांना लावले गेलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध नागरिकांना, महिलांना,लहान मुलांना त्याच्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.अशा विना परवानगी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच नंबर प्लेट नसणाऱ्या ९७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.विना क्रमांकच्या गाड्या गुन्ह्यात वापरण्यात येत असल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.

विना नंबर प्लेटच्या गाड्या विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण शहरांमध्ये अशा वाहनांवर कारवाया करण्यात आल्या असल्याची माहिती वाघचौरे यांनी दिली.एकूण 97 वाहन चालकांवर या कारवाया काल केल्या त्यापैकी 48 विना नंबर प्लेट असणारी वाहने पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आली. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नंबर प्लेट जागेवरच टाकून घेण्याची देखील कारवाई करण्यात आली.याशिवाय मॉडीफाय सायलेन्सर असणारी 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली त्यांचे मॉडीफाय अर्थात विनापरवाना लावलेले सायलेन्सर काढून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवून त्या गाड्या सोडण्यात आल्या.यापुढे देखील शहरात सातत्याने अशी कारवाई करण्यात येणार आहे.सर्वच वाहन चालकांनी दोन्ही नंबर प्लेट सुस्थितीत असल्याची खात्री करावी. त्याप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर कोणी वापरत असाल तर तात्काळ बदली करून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवावे अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
